- आषाढी एकादशी निमित्त संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान सात जुलैला देहूहून होणार आहे
- पुणे ग्रामीण पोलीस या वारीसाठी ५००० पेक्षा जास्त पोलिस तैनात करणार आहेत
- आठ जुलैला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून प्रस्थान करणार आहे
Ashadhi Wari 2026: आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 7 जुलैला होणार आहे. हे प्रस्थान देहूहून होईल. तर 8 जुलैला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीसांनी चोख बंदोबस्ताचे आयोजन केले आहे. पुण्याचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल यांनी याबाबत माहिती दिली आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांना कोणत्या ही अडचणींना समोरे जावे लागणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं. या उपाय योजना कोणत्या आहेत हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी जाणार आहेत. पालखीचा जवळपा 160 किमीचा पालखी मार्ग हा पुणे जिल्ह्यात असणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रत्येक ठिकाणी पोलिस तैनात केले जाणार आहेत अशी माहिती गिल यांनी दिली आहे. पालखीचे रिंगण इंदापूर काटेवाडी, बेलवडी येथे होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी विशेष सुरक्षा पुरवली जाईल. पालखी मार्गामध्ये विनापरवानगी ड्रोन उडविण्यावर बंदी असेल असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. याकाळात काही मार्गावरील वाहतूक वळवण्यात येईल असं ही त्यांनी सांगितलं.
पालखी मार्गावर सतत पोलिस पेट्रोलिंग ठेवले जाईल. सर्व भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी केली जाणार आहे. विशेष म्हणजे या वर्षी डीजे आणि लाऊड स्पीकर मुक्त पालखी सोहळा होईल याची काळजी पोलिसांनी घेतली आहे. तर ही हरित वारी असेल. पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचे नियोजन पुणे पोलिसांनी केले आहे. वारी मार्गावर तब्बल 5000 पेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त असणार आहे अशी माहिती गिल यांनी दिली आहे. कुठेही वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी ऐवढी मोठी पोलीसांची टीम मैदानात असेल.
डीजे फ्री आणि लाऊड स्पिकर फ्री वारी हे या वारीचे वैशिष्ट्य असेल. पुणे ग्रामीण पोलीस वारकऱ्यांसोबत असणार आहेत. संपूर्ण मार्गावर झाडे लावली जाणार आहेत. सर्विलन्स व्हॅन वारीत असणार आहे. बंदोबस्तासाठी 71 अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. त्यांच्या सोबतीला पाच हजार पोलीस तैनात असतील. त्यात एसआरपीएफ, ट्राफीक पोलीस, होमगार्ड यांचा समावेश असेल. वारी चांगल्या पद्धतीने आणि सुरक्षित व्हावी यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा प्रयत्न असेल. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण झाल्याचे ही गील यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world