'मुख दर्शन व्हावे आता, तू सकल जगाचा त्राता' म्हणत महाराष्ट्रातील लाखो भक्त माऊली पांडूरंगाच्या भेटीसाठी धाव घेतात. अखेर श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने आषाढी वारी 339 व्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 28 जून, शुक्रवारपासून देहूतील ईनामदार साहेब वाडा येथून तुकाराम पालखीचं प्रस्थान होणार आहे. यानंतर 16 जुलै, मंगळवारी तुकारामांची पालखी पंढरपूरात पोहोचणार आहे. बुधवारी आषाढी एकादशीला गेल्या महिनाभरापासून माऊलीच्या दर्शनासाठी आतुर असलेले भक्तगण पांडुरंगाचं दर्शन घेतील.
महाराष्ट्राचं अराध्य दैवत विठ्ठलाच्या वारीला मोठा इतिहास आहे. गेल्या आठशेहून अधिक वर्षांपासून वारीची परंपरा सुरू आहे. आषाढी एकादशीला आळंदी, देहूसह राज्यातील अनेक ठिकाणींहून पालख्या दाखल होतात. राज्यातील कानाकोपऱ्यातून विठ्ठलावर अपार प्रेम करणारी आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी यासाठी वारीत दाखल होतात. गरीब-श्रीमंत, जात-पात बाजूला ठेऊन समोरच्याला माऊली हाक मारत नमस्कार करतात. कधी एका ताटात जेवतात, ऐरवी पंचपक्वान्न खाणारे वारीत मात्र रस्त्याच्या कोपऱ्यात पिठलं भाकरीवर ताव मारतात. अशा या वारीची वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण प्रतीक्षा करीत असतात. आषाढी एकादशीला आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूतून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची आणि उत्तर भारतातून कबीराची पालखी पंढरपूरात दाखल होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world