
बदलापुरकरांसाठी (Badlapur to Navi Mumbai) चांगली बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ठाणे, नवी मुंबईकरांना नव्या प्रकल्पांची भेट दिली आहे. या नव्या प्रकल्पांमुळे बदलापूर ते नवी मुंबई प्रवास सुकर होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) माध्यमातून बदलापूर-नवी मुंबई विमानतळादरम्यान प्रवेश नियंत्रण मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या 20 किलोमीटरच्या मार्गासाठी 10,833 कोटी खर्च करण्याचा प्लान आहे. या नव्या प्रकल्पामुळे बदलापूर ते नवी मुंबई अंतर अवघ्या 20 मिनिटात पार करता येणार आहे.
बदलापूर ते नवी मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मात्र रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक व्यवस्थेत अभाव असल्याने येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सद्यपरिस्थितीत ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बदलापूरहून नवी मुंबईला जाण्यासाठी दीड ते दोन तासांचा प्रवास करावा लागतो. अनेकदा वाहतूक कोंडी असल्यास बसने हा प्रवास करण्यासाठी अडीच तासही लागतात. त्यामुळे अनेकदा बदलापूरकर दुचाकीने हा प्रवास करतात.
नक्की वाचा - बदलापूर ते मुंबई अवघ्या 40 मिनिटात, पनवेलला जोडणारा बोगदा ठरणार गेमचेंजर; कधीपासून होणार सुरू?
मात्र या नव्या प्रकल्पामुळे बदलापूर ते नवी मुंबई हा तब्बल 42 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 20 मिनिटात पार करता येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या नव्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावं लागणार आहे. त्यामुळे एमएमआरडीए समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या प्रकल्पाचं काम हाती घेतल्यानंतर पुढील पाच वर्षात मार्ग पूर्ण होईल असं एमएमआरडीएचं नियोजन आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world