काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी 22 वर्षांपूर्वी केलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते आमने-सामने आले आहेत. सहकारी बँकेच्या 153 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात व्याजासह 1444 कोटींच्या वसुलीच्या कारवाईसाठी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे टाळाटाळ करत आहेत. तांत्रिक अडचणी सांगून दिलीप वळसे पाटील व सुनील केदार हे वसुलीसाठी अडथळे निर्माण करत आहेत. तात्काळ वसुली करून ती पिडीत खातेदार व शेतकऱ्यांना वाटप करावी, अशी मागणी रामटेक येथील बेधडक वसुली मोर्चात सहभागी हजारो पिडीत शेतकरी व खातेदारांनी केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजप नेते आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पिडीत शेतकरी व खातेदार संघटना, रामटेक व पारशिवनी तालुकातर्फे 13 सप्टेंबर 2024 ला हा भव्य बेधडक वसुली मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बस स्टॉप रामटेक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय, रामटेक पर्यंत काढण्यात आला.
बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याचे 153 कोटी व व्याजाचे 1444 कोटी रुपयांची वसुली करुन पिडीत शेतकरी व खातेदारांना 2 महिन्यात वाटप करण्यात यावे, ही प्रमुख मागणी पीडित आंदोलनकर्त्यांची आहे.
(नक्की वाचा- अजित पवार म्हणतात मीच साहेब, कोल्हे म्हणाले राज्यात फक्त 2 साहेब, एक बाळासाहेब दुसरे...)
आशिष देशमुख यांनी याबाबत म्हणाले की, "नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवले. त्यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली आणि आज 22 वर्षांनंतर 1444 कोटी रुपयांची वसुली करण्यासंदर्भात सहकारमंत्र्यांनी मागील कित्येक महिन्यांपासून जी दिरंगाई केली, त्याच्या विरोधात रामटेक येथे रामटेक व परशिवनी तालुक्यातील नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यातील पिढीत शेतकरी व खातेदारांचा बेधडक मोर्चा आयोजित करण्यात आला.
सुनील केदार हे न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणून तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून तांत्रिक अडचणी दाखवून वेळ काढत आहे. सहकारमंत्र्यांकडे ही बाब प्रलंबित पडली असून त्यावर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न बँक घोटाळ्यातील पिढीत शेतकरी व खातेदारांना पडला आहे. माझी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी वसुलीचा ऑर्डर लवकरात लवकर काढून पीडित शेतकरी व खातेदारांना न्याय द्यावा, अशी मागणी देखील आशिष देशमुख यांनी केली.
(नक्की वाचा- पूरग्रस्तभागात काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी, व्हिडीओ तुफान व्हायरल)
विदर्भातील संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसंबंधी आयोजित बैठक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी रद्द केल्याबद्दल आशिष देशमुख यांनी रोष व्यक्त केला. कृषीमंत्री धनंजय मुंडे हे अनिल देशमुख यांच्या दबावाखाली आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुनील केदार यांच्या दबावाखाली विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिरंगाई करत आहेत, असे माझे मत आहे. अजित पवार यांच्या गटाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे दबावतंत्रामुळे विदर्भातील शेतकऱ्यांकडे कानाडोळा करत आहेत, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे.