Mumbai News : मुंबईतून एक विचित्र घटना समोर आली आहे. वाहतूक कोंडीमुळे चोरांना पकडणं शक्य झालं आहे. खारमधून ही घटना समोर आली आहे. एका व्यावसायिकाला लुटून पळून जाणारे आरोपी मुंबईतील वाहतूक कोंडीमध्ये अडकले. यातील ३ आरोपी कॅश घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवलीत राहणारा आणि हॉटेलमध्ये मटेरियल सप्लाय करणारा शुभंकर सालीन (४२) याची काही दिवसांपूर्वी जिग्नेश नामक व्यक्तीसोबत लोकल ट्रेनमध्ये भेट झाली होती. जिग्नेशने तो फायनान्सर असल्याचं सांगत बिझनेससाठी १० लाख रुपये देण्याचं मंजूर केलं होतं. आगाऊ रक्कम म्हणून त्याने सालीनकडून काही पैसे मागितले. शुभंकर आणि त्याचे साथीदार कासिम शेख अॅडवान्स म्हणून ५० हजार रुपये घेऊन खार पश्चिमेकडील वृंदावन हॉटेलमध्ये पोहोचला.
चाकू दाखवून मारण्याची धमकी...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही व्यावसायिक तेथे भेटले. त्यावेळी अचानक एका व्यक्तीने त्याच्या हातावर फटका मारत बॅग खेचून घेतली आणि पळ काढला. पुढे काही अंतरावर एक कार उभी होती. तो त्या कारमध्ये जाऊन बसला. या कारमध्ये बसलेला एक आरोपी शुभंकर आणि शेखला चाकूची दाखवून जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरुन पळू लागला. दुसरीकडे व्यावसायिकांनी आरडाओरडा करीत आरोपींच्या कारचा पाठलाग केला. याचदरम्यान एका शाळेजवळ वाहतूक कोंडी झाली, ज्यामुळे आरोपी कारमध्ये अडकले.
बनावट पोलीस ओळखपत्र
त्यानंतर, स्थानिकांनी गाडीला घेराव घातला. स्वतःचा बचाव करण्यासाठी, आरोपींपैकी एकाने महाराष्ट्र पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवले. तर इतरांनी पोलिसांची काठी दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि संतप्त जमावाने संजय म्हात्रे (५०) आणि शक्ती सिंग (४३) या दोन आरोपींना पकडले.
चौकशीदरम्यान खुलासा...
चौकशीदरम्यान दोघांनी इमरान शेख नावाच्या एका अन्य व्यक्तीला यामागील मुख्य सूत्रधार असल्याचं सांगितलं.
तर या टोळीचे दोन आरोपी जोएब शब्बीर सय्यद, राजन मुथ्थूलस्वामी व्यावसायिकांकडून ५० हजारांची कॅश घेऊन पळून जाण्यात यशस्वी राहिले.