छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेला लागलेल्या आगीला वेगळं वळण लागलं आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केल्याने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र बँकेला लागलेल्या आगीचं कारण आता समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकणातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. चौकशीत त्याने सांगितलेलं कारण आणि प्लानिंग ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपूर्वी शनिवारी पहाटे वैजापूरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेला भीषण आग लागली होती. बँक लुटण्यासाठी आलेल्या दरोडखोरांकडून ही आग लावण्यात आली किंवा बँक लुटताना गॅस कटरचा वापर करण्यात आला आणि त्यातूनही आग लागल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र प्रत्यक्षात बँक लुटण्याचा नव्हे तर बँक पेटवून देण्याचाच आरोपींचा कट होता असं तपासात उघड झालं आहे.
(नक्की वाचा- Nagpur Crime: महिलेने काढला शिवसेना नेत्याचा काटा! 15 लाखांची सुपारी, अल्पवयीन मुलासह 8 मारेकरी...)
बँक पेटवण्याचं कारण
बँक पेटवण्याचं कारण देखील तितकच भन्नाट आहे. यातील मुख्य आरोपी भरत कदम याने याच बँकेकडून खोटे कागदपत्र देऊन 63 लाखांचे कर्ज घेतले होते. बँकेच्या तक्रारीनंतर भरत कदम विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याला काही दिवस पोलीस कोठडीत सुद्धा राहावे लागले होते. याचाच राग मनात धरून त्याने थेट बँक अधिकाऱ्यांनाच धडा शिकवायचा निर्णय घेतला.
बँकेला आग लावली तर बँक अधिकाऱ्यांना धडाही मिळेल आणि खोट्या कर्जाबाबतची कागदपत्र जळून खाक होतील आणि पुरावाही नष्ट होईल, असा कट त्याने रचला. या कामासाठी त्यांनी सोबत पाच साथीदारांना घेतल. प्लानिंग करुन बँक पेटवण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा - Prajakta Mali : प्राजक्ता माळीने अख्ख्या जगालाच केलं चॅलेन्ज, नॉनव्हेज खाण्यावरून तोडले अकलेचे तारे!)
बँकेला आग लावण्यासाठी त्याने मालेगाववरून एक सेकंड हॅन्ड कार विकत घेतली. तिला खोटी नंबर प्लेट लावली, चुकून गाडी घटना स्थळावर आढळली तर लक्षात येऊ नये म्हणून गाडीचा चेसिस नंबर सुद्धा मिटवून टाकला होता. मात्र खोटी नंबर प्लेट लावताना खरी नंबर प्लेट तो गाडीतच विसरला आणि याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं. गु्न्हा दाखल केला म्हणून बँक पेटवून दिली, हे ऐकून पोलिसांनाही आधी धक्का बसला.