Political News: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता केंद्रात आणि राज्यात स्वतःचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय वर्तुळात याला 'ऑपरेशन टायगर' असे म्हटले जात असून, या अंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांना आपल्या गोटात खेचण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे.
ऑपरेशन टायगर प्लॅन यशस्वी ठरल्यास, सध्या लोकसभेत 7 खासदार असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ थेट 13 वर पोहोचू शकते. यामुळे नितीश कुमार यांच्या जेडीयू (JDU) पक्षाला मागे टाकत, शिवसेना ही टीडीपी (TDP) नंतर एनडीएमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष बनेल.
(नक्की वाचा- Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)
केंद्रात मंत्रिपदावर दावा आणि मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा
शिंदे गटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेतील संख्याबळ वाढल्यास पक्षाला अनेक मोठे फायदे मिळतील. लोकसभेतील ताकद वाढवून शिवसेना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदावर आपला अधिकृत दावा ठोकू शकते.
राज्याच्या राजकारणावर कसा होईल परिणाम?
एकनाथ शिंदे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी असलेले उत्तम संबंध पाहता, या कामगिरीमुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल. शिंदे समर्थकांना अजूनही असे वाटते की भविष्यात शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवू शकतात.
(नक्की वाचा- School Time: राज्यातील शाळांची वेळ बदलणार? ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने शिक्षणमंत्र्यांकडे काय केली मागणी?)
तज्ज्ञांचं मत काय?
राजकीय समीक्षकांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये मत मांडताना म्हटलं की, या संभाव्य बदल्यांमुळे एकनाथ शिंदे यांचे दिल्लीतील वजन वाढणार असले, तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा फारसा विपरीत परिणाम होणार नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व कायम राहील. 2029 च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत त्यांच्या नेतृत्वाला कोणतेही आव्हान मिळण्याची शक्यता कमी आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.
आम्ही कोणत्याही पक्षात फूट पाडत नाही आहोत, मात्र जर कुणी शिंदेंच्या कामावर विश्वास ठेवून सोबत येत असेल, तर त्यांचे नेहमीच स्वागत आहे, असं शिवसेना नेते वारंवार बोलत आहेत.