Palghar News: भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध केवळ औद्योगिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता आता ते शैक्षणिक आणि सांस्कृतिक पातळीवरही घट्ट होत आहेत. पालघर जिल्ह्यातील चहाडे येथील सूर्या व्हॅली स्कूलमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात जपान इंडिया कल्चरल सोसायटीचे उपाध्यक्ष टोमिओ इसोगाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना जपानमधील करिअरच्या सुवर्णसंधींची माहिती दिली.
50 हजार रोजगाराच्या संधी
टोमिओ इसोगाई यांनी आपल्या मार्गदर्शनात एक महत्त्वाची आकडेवारी मांडली. जपानमधील वाढत्या गरजा आणि भारताचे कुशल मनुष्यबळ पाहता, दरवर्षी सुमारे 50 हजार भारतीय तरुणांना जपानमध्ये विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. जपानी संस्कृती, तेथील प्रगत शिक्षण व्यवस्था आणि भारत-जपान यांच्यातील वाढत्या व्यावसायिक संबंधांमुळे निर्माण होणाऱ्या करिअरच्या संधींवर त्यांनी प्रकाश टाकला.
(नक्की वाचा- Iran Israel War: इराणमधील मिनाबच्या फोटोंनी जग हादरले, ट्रम्प यांची पुतणी देखील सुन्न)
या कार्यक्रमात सूर्या व्हॅली स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपानी साहित्यातील प्रसिद्ध "तोतोचन" या विषयावर आधारित एक नाटक सादर केलं. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाने इसोगाई भारावून गेले. त्यांनी केवळ कौतुकच केले नाही, तर चक्क विद्यार्थ्यांसोबत गाणेही गायले.
मॅथेमॅटिक्स गार्डन आणि योगाची भुरळ
इसोगाई यांनी शाळेतील 'मॅथेमॅटिक्स गार्डन' आणि विद्यार्थ्यांच्या 'योगा' सादरीकरणाला भेट दिली. भारतीय शिक्षण पद्धती आणि जपानी शिस्त यांचा मेळ बसल्यास विद्यार्थी जागतिक स्तरावर चमकू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, भविष्यात या विद्यार्थ्यांना जपान दाखवण्याची इच्छाही त्यांनी यावेळी प्रदर्शित केली.
(नक्की वाचा- महासागरात रक्ताचा सडा! भारतातून परतणारी इराणची युद्धनौका अमेरिकेने उडवली; शेकडो सैनिकांना जलसमाधी)
या कार्यक्रमाला एओटीएस अल्युम्नी असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष प्रवीण पुरव, प्रज्ञा शेट्टी, कल्पगजेंद्र कमलाकर पाटील शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे उपस्थित होते. कल्पगजेंद्र कमलाकर पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले होते.