
Kalyan APMC Market : कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मार्केटमध्ये शेतकरी शेडच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पणन महामंडळाच्या संचालकांनी चौकशी करून 31 डिसेंबरपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
हे प्रकरण एपीएमसीचे माजी संचालक मयूर पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित आहे. याचिकेमध्ये त्यांनी आरोप केला आहे की, शेतकरी शेडसाठी आरक्षित असलेल्या जागेवर नियमांचे उल्लंघन करून व्यावसायिक गाळे उभारले जात आहेत.
काय आहे प्रकरण?
याचिकाकर्ते पाटील यांनी त्यांचे वकील भरतकुमार नुकते यांच्यामार्फत बाजू मांडताना म्हटले की, शेतकरी शेडची जागा आरक्षित आहे आणि त्याचा व्यावसायिक वापर करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता, बहुमताच्या जोरावर या जागेवर व्यापारी गाळे बांधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवली हादरले: नमाजासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांसमोरच मारहाण; शिंदे गटाच्या सरपंचावर आरोप )
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने एपीएमसी प्रशासन आणि संचालक मंडळाला जाब विचारला. न्यायालयाने विचारणा केली की, 'शेतकरी शेडचे आरक्षण बदलले आहे का आणि त्यासाठी पणन महामंडळाची परवानगी घेतली आहे का?' या प्रश्नावर, अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.
याची गंभीर दखल घेत, न्यायालयाने पणन महामंडळाच्या संचालकांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून 31 डिसेंबर, 2025 पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world