- अत्रे नाट्यगृहातील वारंवार होणाऱ्या इलेक्ट्रिक स्पार्किंगमुळे प्रयोगादरम्यान नाटक थांबवावे लागते
- नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा अनेकदा बंद असल्याने कलाकार आणि प्रेक्षकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो
- लॉकडाऊन काळात नाट्यगृह दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते पण सुधारणा होत नसल्याचा आरोप केला जात आहे
अमजद खान
'अलबत्या गलबत्या' या लोकप्रिय नाटकाच्या कलाकारांनी अत्रे नाट्यगृहाच्या दुरवस्थेला वाचा फोडली आहे. येथील असुविधांमुळे थेट प्रयोगांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. प्रयोगादरम्यान होणारे शॉर्ट सर्किट आणि बंद असलेले एसी यामुळे नाट्यगृहाची अवस्था 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी झाली आहे. कल्याणमधील सांस्कृतिक केंद्र मानल्या जाणाऱ्या आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिराच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रसिद्ध नाटक 'अलबत्या गलबत्या'च्या कलाकारांनी येथील गैरसोयींबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने, आता या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची वेळ आल्याचा इशारा कलाकारांनी दिला आहे.
नाट्यगृहात नेमक्या समस्या काय?
अत्रे नाट्यगृहात सुविधांचा मोठा अभाव असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढताना सांगितले की, प्रयोगादरम्यान वारंवार होणाऱ्या इलेक्ट्रिक स्पार्किंगमुळे अनेकदा नाटक मध्येच थांबवावे लागते. यामुळे प्रेक्षक आणि कलाकार या दोघांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा (AC) अनेकदा बंद असते, ज्यामुळे उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. हे गोष्टी वारंवार होत आहे. त्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप आणि राजकीय पडसाद
या प्रकरणावरून आता राजकारणही तापले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी उमेश बोरगावकर यांनी या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. लॉकडाऊन काळात नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मग तो निधी गेला कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यामुळे आता या समस्येवरून कल्याणचं राजकारण ही तापणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अत्रे नाट्यगृहाची ही स्थिती अनेक वर्षापासून आहे. पण त्यात काही सुधारणा होत नाही.
कलाकारांचा इशारा
आपल्या लाडक्या 'चिचू चेटकिणी'चे नाटक पाहण्यासाठी गेलेल्या कल्याणकरांना नाट्यगृहाच्या दुरवस्थेचा सामना करावा लागत आहे. 'अलबत्या गलबत्या' नाटकाच्या टीमने नाट्यगृहातील भयानक वास्तव समोर आणले आहे. वारंवार होणारे इलेक्ट्रिक स्पार्क आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आहे. गेल्या 3-4 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कलाकारांनी भविष्यात या नाट्यगृहात प्रयोग न करण्याचा टोकाचा पवित्रा घेतला आहे. आता या सर्व प्रकारावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.