- कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात गाडी हळू चालवण्याच्या वादातून एका कुटुंबावर घरात घुसून हल्ला केला
- या हल्ल्यात घराची तोडफोड केली गेली आणि कुटुंबीयांना जबर मारहाण केली
- झुल्फेकर अली यांच्या कुटुंबीयांवर हा भयंकर हल्ला करण्यात आला
अमजद खान
कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात किरकोळ कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. गाडी हळू चालव असे सांगितल्याचा राग आल्याने, पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबावर हल्ला केला. धक्कादायक म्हणजे हा हल्ला त्यांच्या घरात घुसून करण्यात आला. त्यात त्यांनी त्यांच्या घराची तोडफोड ही केली. शिवाय कुटुंबीयांना बेदम मारहाण ही करण्यात आली. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
टिटवाळा आंबेकर चौक परिसरातील आर.के. चाळ, राजेश्वरी बिल्डिंगजवळ ही घटना घडली. 50 वर्षीय तक्रारदार झुल्फेकर अली अब्दुल्ला खान हे आपल्या भावांसह फॅब्रिकेशनचे काम करतात. ते आपल्या भावांसह घराबाहेर उभे होते. त्यावेळी एक तरुण मोटारसायकलने वेगात जात होता. त्यावेळी त्यांनी त्याला येथून गाडी हळू चालवा असे सांगितले. त्यामुळे तिथेच वाद निर्माण झाला. त्यानंतर संबंधित तरुण त्या ठिकाणावरून निघून गेला. मात्र काही वेळात तो काही लोकांना घेवून झल्फेकर अली यांच्या घरा जवळ आला.
त्यावेळी त्या तरुणासोबत त्याचे वडील जाहीर इदरिसी, फरहान इदरिसी, शौकील इदरिसी , इमरान इदरिसी आणि काही साथीदार होते. त्यांनी तिथे शिवीगाळ करत लोखंडी वस्तूने घराची तोडफोड करण्यास सुरूवात केली. शिवाय तक्रारदाराला जबर मारहाण केली. त्यांच्या तोंडावर मारल्याने त्यांचे दोन दात ही पडले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्याने झल्फेकर अली यांचे कुटुंबीय हादरून गेले होते. मारेकरी कुणाचे ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी जोरदार हल्ला चढवला होता.
या हल्ल्यात तीन जण जखमी झाले झाले. ही मारहाण होत असताना संबंधीत कुटुंबाने स्वतःला अर्धा तास घरातच कोंडून घेतले होते. या मारहाणीनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पाच जणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. टिटवाळ्यात गेल्या काही दिवसात मारहाणीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरात पोलीसांचा काही धाक आहे की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world