Kalyan News : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर या दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्या सुरू झाल्या. आता शिवसेना (शिंदे गट)चे २५ पदाधिकारी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. 'आमची कासवाची चाल आहे. आम्हीच जिंकणार' असं प्रत्युत्तर भाजपने शिवसेना शिंदे गटाला दिल्यानंतर स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराजी...
चार दिवसापूर्वी भाजपचे निष्ठावान पदाधिकारी चंद्रशेखर म्हात्रे यांच्या नेतृत्वात भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड आणि दीपेश म्हात्रे यांच्यात शाब्दिक आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. आज शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अर्जित खडकुल यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे माजी पदाधिकारी अर्चित खडकूल यांनी शिवसेना (शिंदे गट) नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. पक्षात पद देण्यास विलंब करण्यात आला, तसेच एका बैठकीदरम्यान वरिष्ठ पदाधिकाऱ्याने आपल्याला बैठकीतून हाकलून दिल्यामुळे आम्ही नाराज झालो.
भाजपा जिल्हा अध्यक्षांची प्रतिक्रिया
भाजपा डोंबिवली मंडल कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात दरम्यान भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी यावेळी सांगितलं. "आमची कासवाची चाल आहे, शेवटी विजय आमचाच होईल," असे म्हणत भाजपच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त केला. हा प्रवेश शिवसेना (शिंदे गट)ला भाजपकडून दिलेले राजकीय प्रत्युत्तर मानले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावेळी केडीएमसी भाजप गटनेते शशिकांत कांबळे हे देखील उपस्थित होते. दरम्यान, अर्चित खडकूल यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेना (शिंदे गट)च्या संबंधित नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world