Kalyan Railway Station: भारतीय रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका नेहमीच प्रवाशांना बसत असतो. पण ट्रेन उशीरा आल्याचा मनस्ताप सहन करणाऱ्या एका व्यक्तीला रेल्वेनेच आर्थिक भुर्दंड दिल्याचा एक संतापजनक प्रकार कल्याण स्टेशनवर समोर आला आहे. आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला प्लॅटफॉर्म तिकीटाची मुदत संपल्याचे सांगत तिकीट तपासनिसाने (TC) तब्बल 500 रुपयांचा दंड ठोकला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकी घटना काय?
व्हायरल व्हिडीओमधील माहितीनुसार, एक व्यक्ती दुपारी 12 वाजता आपल्या नातेवाईकांना गाडीत बसवून देण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर आली होती. नियमांचे पालन करत या व्यक्तीने रीतसर प्लॅटफॉर्म तिकीट देखील काढले होते.
संबंधित ट्रेन दुपारी 12 वाजता येणे अपेक्षित होते. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून ती गाडी उशीरा असून दुपारी 2 वाजेपर्यंत येईल, अशी अनाऊन्समेंट करण्यात आली. नातेवाईक सोबत असल्याने आणि त्यांना ट्रेनमध्ये सुरक्षित बसवून द्यायचे असल्याने तो प्रवासी स्टेशनवरच थांबला. परंतु, रेल्वेचा कारभार इथेच थांबला नाही; ती ट्रेन तब्बल 4 ते 5 तास उशीरा आली.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
पाहा VIDEO
ट्रेन लेट तरीही दंड प्रवाशाला
नातेवाईकांना ट्रेनमध्ये बसवून दिल्यानंतर जेव्हा ही व्यक्ती स्टेशनबाहेर जाण्यासाठी निघाली, तेव्हा प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असलेल्या टीटीने त्यांना थांबवले आणि तिकीटाची विचारणा केली. प्रवाशाने प्रामाणिकपणे आपले प्लॅटफॉर्म तिकीट दाखवले.
(नक्की वाचा- Mumbai News: गांजा तस्करी करताना मॉडेलला अटक; मुंबई विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई)
परंतु, तिकीट पाहताच टीसीने सांगितले की, "प्लॅटफॉर्म तिकीटाची मुदत केवळ 2 तासांचीच असते. तुमच्या तिकीटाची वेळ संपली आहे, त्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागेल. नियमाप्रमाणे या व्यक्तीने 500 रुपयांचा दंड देखील भरला. यानंतर बनवलेल्या व्हिडीओत प्रवाशाने अत्यंत वाजवी प्रश्न उपस्थित केला की, ट्रेन 4-5 तास उशीरा आली, यात माझी काय चूक? रेल्वे लेट आली याची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेणार का?
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना देखील रेल्वेच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया दिली.