KDMC News Today : कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर वसुलीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून दादागिरी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे सर्वोदय सागर या सोसायटीतील रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 112 कुटुंब राहत असलेल्या या सोसायटीतील 102 रहिवाशांनी कर भरला होता. परंतु, 10 थकबाकीदारांमुळे सर्वांचेच पाणी कनेक्शन तोडण्यात आले.कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिकृत नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी,धमकावणे आणि गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत.“कर भरा नाहीतर पाणी बंद,” अशा धमक्या देण्यात आल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.ईद सणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे.रविवार असल्याने बँका बंद होत्या,त्यामुळे काही रहिवाशांना तत्काळ कर भरणे शक्य नव्हते.तरीही अधिकाऱ्यांनी कोणतीही सवलत न देता पाणीपुरवठा बंद केला.
नक्की वाचा >> महिलांकडून महिलांसोबत घाणेरडे चाळे, मुंबई लोकल ट्रेनमध्ये सुरू आहे भयानक प्रकार; Instagram वर खळबळजनक व्हिडीओ
"अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे"
स्थानिक रहिवासी अश्फाक शेख यांनी संताप व्यक्त करत म्हटलंय,"आम्ही नियमित कर भरतो.लाखो रुपये देतो.तरीही आम्हाला चोर म्हणत अपमानित करण्यात आले.हा प्रकार आम्ही सहन करणार नाही.संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे,अन्यथा आम्ही रास्ता रोको आंदोलन करू.” पाणी हा मूलभूत हक्क असताना कर वसुलीसाठी संपूर्ण इमारतीला शिक्षा देणे योग्य आहे का,असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण असून नागरिक प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत.