Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. माझ्याशी लग्न कर असा तगादा लावून धमकावणाऱ्या माजी सरपंचाचा तिच्याच प्रियकराने गळा दाबून खून केला. हत्येनंतर या गुन्ह्याची वाच्यता होऊ नये म्हणून आरोपीने मृतदेह स्वतःच्या कारमध्ये टाकून थेट भिवंडी गाठली. मात्र, भिवंडी पोलिसांनी संशयित कार पकडल्यानंतर या भयंकर हत्येचा पर्दाफाश झाला आहे.
भिवंडी पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा शिवाजी न्यारे असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव असून, त्या शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील माजी सरपंच होत्या. सुरेखा या आरोपीकडे सतत लग्नासाठी तगादा लावत होत्या आणि माझ्याशी लग्न कर असे सांगून धमकावत होत्या. याच रागातून आरोपीने त्यांचे आयुष्य संपवण्याचा भयानक निर्णय घेतला.
(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)
शिरगाव येथे आरोपीने सुरेखा यांचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मृतदेह स्वतःच्याच कारमध्ये ठेवला आणि कोल्हापूरवरून थेट भिवंडीच्या दिशेने प्रवास सुरू केला.
(नक्की वाचा- Rain News: महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट)
आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू पाटील अटकेत
भिवंडी पोलिसांनी शंका आल्यावरून संशयित कार थांबवून तपासणी केली असता, कारमध्ये मृतदेह आढळून आला आणि हत्येचे हे भयानक सत्र उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील याला तातडीने ताब्यात घेऊन अटक केली आहे. भिवंडी पोलिसांनी या घटनेची माहिती कोल्हापूरच्या शाहूवाडी पोलिसांना दिली असून, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पथक पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी रवाना झाले आहे. या घटनेमुळे शाहूवाडी तालुक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world