उद्याचा 'महाराष्ट्र बंद' मागे घ्या, शरद पवार यांचं महाविकास आघाडीला आवाहन

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली. त्यात आता शरद पवार यांनी देतील बंद मागे घ्यावा, असं आवाहन केल्याने आता बंद होईल की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने शनिवारी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीने पुकारलेला बंद बेकायदेशीर ठरवत बंदला मनाई केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महाविकास आघाडीची मोठी अडचण झाली. त्यात आता शरद पवार यांनी देतील बंद मागे घ्यावा, असं आवाहन केल्याने आता बंद होईल की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवार यांना ट्वीट करत म्हटलं, "बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता."

Advertisement

"उद्याचा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही.  भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते", असं शरद पवार यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा-  मविआचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, हायकोर्टाचा निर्णय)

महाविकास आघाडीची कोंडी 

काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बंदवर ठाम होते. मात्र शरद पवार यांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे कोंडी झाली आहे. शिवसेना ठाकरे गट देखील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. नाना पटेल यांनी म्हटलं होतं की, राज्यात आज मुली सुरक्षित नाहीत. माननीय न्यायालयाचा आम्ही सन्मान करतो. मात्र मी आधी नागरिक आहे, नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहे.  आंधळ्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहेत. 

आमच्या भावना आम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि त्या आम्ही करू. न्यायालयाचा अवमान आम्ही करणार नाही. जनभावना आम्ही मांडू शकतो. महाराष्ट्र जनतेचे हे आंदोलन असणार आहे. जनसामान्य म्हणून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटलं.  

(नक्की वाचा- मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार पहिल्यांदाच थेट बोलले, मविआमध्ये नवा ट्विस्ट)

कोर्टाने काय म्हटलं?

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदविरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बंद करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा बंदला मनाई करावी अशी, मागणी करणारी याचिका सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने कोणत्याही पक्षाला बंद करता येणार नाही. बंद केल्यास त्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, असा आदेश सरकारला दिला आहे.

Advertisement