विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भोपळाही फोडता आला नाही. 'माझ्या हाती एकदा सत्ता देऊन बघा', असं म्हणत राज्यभर प्रचारसभा घेतलेल्या राज ठाकरेच्या पदरी यावेळीही निराशाचा पडली आहे. प्रचारसभांमध्ये तासंतास बोलणाऱ्या राज ठाकरेंनी पराभवावर मात्र तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करत राज ठाकरे यांनी म्हटलं की, "अविश्वसनीय! तूर्तास एवढेच..."
(नक्की वाचा- मविआवर मोठी नामुष्की; सत्ता सोडा विरोध पक्षनेतेपदही मिळणार नाही)
अमित ठाकरेंची पराभवावर पोस्ट
माहीम मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, "माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो."
"मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे. माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती… कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची - जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं."