Mumbai News: मुंबईतील भांडुप परिसरात बेस्ट बसने अनेकांना चिरडल्याची घडना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. अपघात नेमका कसा घडला याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पोलिसांनी बस चालकांना ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र तांत्रिक बिघाड की चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.
बस अपघातातील मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून, 9 प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर आहे. जखमींवर एम. टी. अग्रवाल रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, सायन रुग्णालय, मिनाज हॉस्पिटल, फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
(नक्की वाचा- वसईत खळबळ! प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या विवाहित तरुणाचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?)
रुग्णालयातील मृतांचा आणि जखमींची माहिती
वर्षा सावंत (25 वर्षे), मानसी मेघश्याम गुरव (49 वर्षे), प्रशांत शिंदे (53 वर्षे), प्रणिता संदीप रसम (35 वर्षे) अशी मृतांचा नावे आहेत. तर नारायण भिकाजी कांबळे, मंगेश मुकुंद दुखांडे, ज्योती विष्णू शिर्के, प्रशांत दत्ताराम लाड, शीतल प्रकाश हाडवे , दिनेश विनायक सावंत, पूर्वा संदीप रसम, प्रताप गोपाळ कोरपे, रवींद्र सेवाराम घाडीगावकर आणि रामदास शंकर रूपे दोघांना किरकोळ दुखापत झाली असून प्रकृती स्थिर आहे.
(नक्की वाचा- Kalyan News: विरार-अलिबाग कॉरिडॉरचा म्हाडाला फटका! कल्याणमधील गृहप्रकल्पाच्या जमिनीतून जाणार रस्ता)
मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, "मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल."