- मेहबूब जमादार, प्रतिनिधी
Mumbai-Goa National Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. पोलादपूरजवळील कशेडी घाटात (Kashedi Ghat) धामणदिवी गावाजवळ मध्यरात्रीच्या (15 जुलै) सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्रीच्या दरड कोसळल्याने महामार्गावरील कोकणाकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात दगड माती पसरली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पण सुरक्षेच्या कारणास्तव आणि रस्त्यावरील ढिगाऱ्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या एकाच लेनवरून दोन्ही बाजूंची वाहतूक संथ गतीने सुरू ठेवण्यात आली आहे.
(नक्की वाचा: E20 Petrol: नितीन गडकरींच्या बदनामीचा आरोप; 4 यूट्युबर्सवर नागपुरात गुन्हा दाखल)
दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम प्रशासनाकडून लवकरच हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास करताना काळजी घ्यावी आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world