मुंबई शहर आणि उपनगरांसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली असून तो आता 9 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, तलावांमधील पाणीसाठा आता 8.93% झाला आहे, जो आदल्या दिवशी 8.12% होता. दुसरीकडे, हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी 5 जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
तलावांमधील पाणीसाठ्याची ताजी आकडेवारी
मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत पसरलेले सातही तलाव प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहेत. जून महिन्यात मान्सून उशिरा सुरू झाल्यामुळे तलावांतील पाणी पातळी खालावली होती. परंतु गेल्या 24 तासांतील पावसाने यात सुधारणा केली आहे. मुंबईच्या तलावांची एकूण साठवणूक क्षमता 14,47,363 दशलक्ष लिटर असून सध्या त्यात 1,29,309 दशलक्ष लिटर पाणी साठले आहे.
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल #MyBMCUpdates pic.twitter.com/OpipmFoxJd
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 3, 2026
(नक्की वाचा- VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये चमत्कार! अमृतकुंडातील लुप्त झालेल्या प्राचीन शिवलिंगाचे अचानक दर्शन)
तलावनिहाय पाणीसाठ्याची स्थिती
- विहार तलाव: या तलावातील साठ्यात मोठी वाढ झाली असून तो 57.18% वरून थेट 61% च्या पुढे गेला आहे.
- तुळशी तलाव: गेल्या 24 तासांत येथील साठा लक्षणीय वाढून 39.43% वर पोहोचला आहे.
- मोडक सागर: या तलावाची पातळी किरकोळ वाढून 22.64% झाली आहे.
- मध्य वैतरणा: येथील पाणीसाठा किंचित वाढीसह 12.86% झाला आहे.
- भातसा तलाव: सर्वाधिक क्षमता असलेल्या या तलावात 6.6% साठा जमा झाला आहे.
- तानसा तलाव: 30 जून रोजी जवळपास कोरडा पडलेला हा तलाव आता 5% वर आला आहे.
- अप्पर वैतरणा: या तलावात अद्यापही कोणताही उपयुक्त साठा उपलब्ध झालेला नाही.
तलाव क्षेत्राचा विचार केला असता, गेल्या 24 तासांत तुळशी तलावात 164 मिमी आणि विहार तलावात 137 मिमी अशा सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित तलाव क्षेत्रांत 36 मिमी ते 73 मिमी पाऊस पडला.
(नक्की वाचा- IAS Transfer : राज्यात प्रशासकीय फेरबदल! 3 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या)
पुढील 48 तास महत्त्वाचे; ठाण्याला शनिवारी 'रेड अलर्ट'
सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील तापमानात घट झाली असून ते 22 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने पुढील 48 तासांत मुंबई आणि उपनगरात तीव्र वारे आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
- मुंबई: ५ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट, तर सोमवारसाठी (6 जुलै) 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
- ठाणे आणि पालघर: या दोन्ही जिल्ह्यांसाठी रविवारपर्यंत ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत. विशेषतः शनिवारी ठाणे जिल्ह्यात अत्यंत तीव्र पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट देण्यात आला आहे.
- नाशिक: नाशिक जिल्ह्यासाठी शनिवारी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world