जुई जाधव, मुंबई
Mumbai News: मुंबईतील वरळी कोस्टल पुलावरून एक धक्कादायक अपघात झाला आहे. सोमवारी रात्री वरळीहून वांद्रेकडे जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवर आर्टिगा कारचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने पुलाची रेलिंग तोडली आणि ती थेट समुद्राच्या पाण्यात कोसळली.
या अपघाताच्या वेळी कारमध्ये चालक एकटाच होता. कार समुद्राच्या पाण्यात कोसळतानाचे हे दृश्य पाहून, तिथे कर्तव्यावर तैनात असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तातडीने धावले. या जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उडी घेतली.
(नक्की वाचा- Film City in Nashik: नाशिकच्या इगतपुरीत उभारणार फिल्म सिटी, जमिनीलाही मंजुरी; काय आहे सरकारचा प्लान?)
जवान खोल पाण्यात पोहोचले आणि त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर दोरीच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी दाखवलेले हे धाडस आणि वेळेवर केलेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. चालकाचा जीव वाचल्यामुळे या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वरळी पोलीस या घटनेबाबत आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहेत.