Mumbai News : मुंबईतील 'या' भागात दहशतीचं वातावरण; व्यापाऱ्यांकडून दुकानं बंद ठेवण्याचा इशारा

देशभरात मुंबई सर्वात सुरक्षित शहर मानलं जातं, मात्र मुंबईतील या भागात मात्र नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो / AI Image

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai News : मुंबईतून गँगवॉर संपवण्यात पोलिसांना यश आलं असलं तरीही अद्याप लहान-मोठ्या टोळी गँगमुळे मुंबईकरांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. याचा सर्वाधिक फटका दुकानदारांना बसत असल्याचं दिसत. मुंबईच्या ट्रॉम्बेमधून एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये कथित भाईंकडून दहशत पसरवली जात आहे.

मुंबईतील ट्रॉम्बेच्या महाराष्ट्र नगरमधील व्यापारी आणि सामान्य नागरिकांना या कथित भाईंकडून मनस्ताप होत आहे. या भाई लोकांकडून सर्रास हप्ता वसुली केली जाते. हप्ता दिला नाही तर थेट दुकानदारांना मारहाण केली जात असल्याची तक्रार समोर आली आहे.

Advertisement

नक्की वाचा - 'मी पप्पा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही'; आत्महत्येपूर्वी बापाची हळहळ; लेकीचा रिप्लाय वाचून अंगावर काटा येईल 

व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण...

महाराष्ट्रनगरमधील करण पारखे (वय २५), मिट्टू पारखे (वय २२) हे या परिसरात दहशत पसरवत आहे. परिसरात व्यवसाय करणारे व्यापारी, रस्त्याने चालणारे नागरिक, परप्रांतीय यांना विशेष लक्ष्य करत तलवारीचा धाक दाखवतात. या दोन्ही भावांकडून लूट केली जाते. याप्रकरणी महाराष्ट्र व्यापारी असोसिएशन आक्रमक झाली असून रोज होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी दुकान बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. काल एका दुकान व्यावसायिकाला हप्ता दिला नाही म्हणून मारहाण झाल्यानंतर सर्व व्यापारी ट्रॉम्बे पोलीस ठाणे येथे गेले होते. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात दिरंगाई केल्याची तक्रार दुकानदारांकडून केली जात आहे. अद्याप दोन्ही कथित भाई मोकाट फिरत असून व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे. 

Topics mentioned in this article