
मुंबईतील नागरिकांना रस्त्यांवरुन सुलभतेने चालता यावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस, निकामी, भंगार वाहनांची ओळख पटवून नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. महानगरपालिका प्रशासन आणि कंत्राटदार मार्फत नियमितपणे ही कारवाई सुरू आहे. मुंबईकर नागरिकदेखील बेवारस वाहनांची तक्रार करू शकतात. सार्वजनिक रस्त्यावर बऱ्याच कालावधीसाठी बेवारस पडून असलेली वाहने लक्षात आल्यास नागरिकांनी कंत्राटदारांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर वाहनाचे छायाचित्र व गुगल लोकेशनसह तक्रार करावी. तसेच, 1916 क्रमांक किंवा महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
तक्रार करता येणार
मुंबईकर नागरिकांच्या वाहतूक सुलभतेसाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच, रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस भंगार वाहनांची विल्हेवाट लावण्याचे धोरण निश्चित केले आहे. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी बऱ्याच कालावधीसाठी दुरवस्थेत पडून असलेल्या बेवारस वाहनांची ओळख पटवून, नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने बाह्य संस्थांची नेमणूक केली आहे. केवळ दंडात्मक कारवाई करणे, हा प्रशासनाचा उद्देश नसून रस्त्यांवरील अडगळ दूर करण्यास सर्वेच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
(नक्की वाचा: Malegaon Bomb Blast : 'काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी', मालेगावच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी)
नंबर केले जारी
शहर विभागासाठी मेसर्स आईफ्सो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड मोबाईल क्रमांक 7505123456, पूर्व उपनगरांसाठी मेसर्स रझा स्टील मोबाईल क्रमांक 9819543092 आणि पश्चिम उपनगरांसाठी मेसर्स प्रदीप ट्रेडिंग कंपनी मोबाईल क्रमांक 8828896903 या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. या कंत्राटदारांमार्फत नियमितपणे व नियमाधीन कारवाई सुरू आहे. महापालिका बेवारस वाहनावर नोटीस बजावण्यात येते. वाहनमालकाने नोटीस बजावल्यापासून 72 तासांच्या आत वाहन सार्वजनिक रस्त्यावरुन हटवले नाही, तर सदर वाहन 'टोईंग' करून कंत्राटदाराच्या यार्डमध्ये नेण्यात येत आहेत. तसेच, 30 दिवसांनंतर या वाहनाची विल्हेवाट लावली जात आहे. त्याबाबत कुठलाही दावा करता येत नाही. त्यामुळे टोईंग करुन यार्डमध्ये जमा केलेले वाहन हवे असल्यास वाहनमालकांनी 30 दिवसांत देय दंडाची रक्कम भरावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
नक्की वाचा - Manikrao Kokate: 'माणिकराव कोकाटे क्रीडामंत्री झाले तर रम्मी जागतिक दर्जाचा खेळ बनेल'
मुंबई मनपाचे आवाहन
मुंबईकर नागरीकांनी देखील सार्वजनिक रस्त्यावर बऱ्याच कालावधीसाठी बेवारस पडून असलेली वाहने लक्षात आल्यास शहर विभाग क्रमांक 7505123456, पूर्व उपनगरे क्रमांक 9819543092 आणि पश्चिम उपनगरेक्रमांक 8828896903यांच्याकडे संपर्क साधावा. भ्रमणध्वनी क्रमांकांवर वाहनाचे छायाचित्र व गुगल लोकेशनसह तक्रार नोंदवावी. यासमवेतच महानगरपालिकेच्या 1916 या क्रमांकावर किंवा महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world