बीएमसीच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या निविदेत 90 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांनी केला होता. यावर मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांसाठी करण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता करण्यात आल्याचे आरोप प्रसार माध्यमातून करण्यात येत आहेत. त्यामध्ये तथ्य नाही. याबाबत जनमानसात गैरसमज पसरू नये म्हणून वस्तूस्थितीदर्शक स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिठी नदीचे पात्र अनेक ठिकाणी अतिशय रुंद आहे. ही बाब लक्षात घेता, नदीतून गाळ काढण्यासाठी 35 मीटर लांब बूम तसेच 1.5 क्यूबिक मीटर क्षमतेची बकेट असणारे पोकलेन मशीन तैनात करणे, ही अट निविदेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. जेणेकरून मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम प्रभावीपणे करता येऊ शकेल.
Maharashtra Politics: भाजपची शाखा का काढली? टोळक्याचा तरुणावर हल्ला; अकलूजमध्ये राजकीय राडा!
सदर निविदा प्रक्रिया अद्याप अंतिम झालेली नाही. या निविदेच्या अनुषंगाने, काही निविदाकारांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सदर बाबीला आव्हान दिले आहे. त्यामुळे सदर बाब तुर्त न्यायप्रविष्ट आहे, असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. यावर पुढील सुनावणी दिनांक 4 मार्च 2025 रोजी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये याबाबत महानगरपालिका प्रशासन पुढील कार्यवाही करणार आहे.
(नक्की वाचा- Pune Swargate Bus Depot Case : शेकडो पोलिसांची फौज, श्वान पथक, ड्रोन... दत्तात्रय गाडे पोलिसांना कसा सापडला?)
अनिल परब यांचे आरोप
बीएमसीच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या निविदेत 90 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. मिठी नदी गाळ काढण्याच्या कामात आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीकडून चौकशी सुरू केली असतानाही घोटाळा सुरू आहे. माझ्या पत्रावर बीएमसीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. येत्या अधिवेशनात बीएमसी अधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा अॅड. अनिल परब यांनी दिला आहे.