Mumbai Rains Update: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आली आहे. मात्र, ठाणे - कर्जत, खोपोली आणि कसारा स्थानकादरम्यान शटल सेवा सुरू आहे.
हार्बर रेल्वेवरही परिणाम
हार्बर मार्गावरील चुन्नाभट्टी स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे कुर्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सध्या अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या परिस्थितीमुळे मुंबईतील रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.