Mumbai Toll Tax Free : मुंबई टोलमुक्त, कोणत्या वाहनांना सूट मिळणार? प्रवाशांची किती बचत होणार?

Mumbai Entry toll plaza : राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयामुळे कोणत्या वाहनांना टोलमाफी मिळेल?

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर (Toll Plaza) आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबईत (Mumbai Entry toll plaza) ये-जा करणाऱ्या हलक्या मोटार वाहनांना टोलमाफी (Mumbai Toll Tax Free) करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आज रात्रीपासून हा निर्णय अमलात आणण्यात येणार आहे.  

कोणत्या वाहनांना सूट?
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, हलक्या मोटार वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा, 1988 नुसार हलक्या मोटार वाहनांमध्ये... 

कार, जीप, वॅन, छोटे ट्रक, डिलिव्हरी वॅन, टॅक्सी आदी  वाहनांना समावेश होतो (वाहनांमधील प्रवाशांची संख्या 12 पर्यंत, चालकाव्यतिरिक्त)

नक्की वाचा - मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना टोलमाफी

मिनी बस किंवा त्यासारखी वाहन..
(प्रवाशांची संख्या 12 पेक्षा अधिक अन् 20 प्रवाशांपर्यंत - चालकाव्यतिरिक्त )

प्रवाशांची किती होणार बचत?
मुंबईत प्रवेश करताना दहिसर टोल, आनंदनगर टोल, वैशाली, ऐरोली आणि मुलुंड टोलसह पाच टोलप्लाझा आहेत. या टोलवर 45 ते 75 रुपयांपर्यंत वसुली केली जाते. या रकमेचा नियम 2026 पर्यंत लागू होता. मुंबईत दररोज साधारण 3.5 लाख वाहनं ये-जा करतात. यातील 70 हजार जड वाहनं आणि 2.80 लाख हलकी वाहनं येत असतात. आज सरकारने रात्री 12 वाजल्यापासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती जाहीर केली आहे. यामुळे लोकांना रांगेतील वेळ वाया जाणार नाही. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज ठाकरेंकडून आनंद व्यक्त
सरकारकडून बऱ्याच दिवसांपासून या निर्णयावर चर्चा सुरू होती. आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय जाहीर केल्यानंतर राज ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आणि सर्व नागरिकांचं अभिनंदन केलं. राज ठाकरे म्हणाले, टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत. या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला. आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले. महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे 'टोलच्या आंदोलनाचं काय झालं?' असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन.