- नवी मुंबईत भंगार विक्रीच्या आड अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे
- नेरूळ सेक्टर 28 येथील रेल्वे पटरी परिसरात २२ लाख रुपये किमतीचे हिरोईन आणि गांजा जप्त करण्यात आले आहेत
- सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये महिलांसह पुरूषांचा समावेश आहे
राहुल कांबळे
भंगार विक्रीच्या नावाखाली चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. पोलीसांनाही याची माहिती मिळताच ते ही हादरून गेले आहेत. ही प्रकार नवी मुंबईत घडला आहे. भंगार विक्रीच्या नावाखाली चक्क अंमली पदार्थांची विक्री केली जात होती. अशा टोळीचा नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 22 लाख रुपये किमतीचे 43.6 ग्रॅम हिरोईन आणि 26 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई नेरूळ सेक्टर 28 येथील रेल्वे पटरी परिसरात करण्यात आली. या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली आहे.
नेरूळ रेल्वे स्टेशनजवळील सार्वजनिक पुलाच्या बाजूला झोपडीत भंगाराचे दुकान होते. तिथे भंगारच विकला जाणार असा सर्वांचा समज होता. पण त्याच्या आत भयंकर प्रकार सुरू होता याचा साधा संशय ही कुणाला आला नाही. याच भंगारच्या आडून सर्रास अंमली पदार्थांची विक्री केली जात होती. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चार पोलीस अधिकारी व 15 पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने दुपारी 12.30 वाजता नेरूळ पोलीस ठाण्याच्या मदतीने छापा टाकला. छाप्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून आल्याने संबंधितांना ताब्यात घेण्यात आले.
यामध्ये महिलांसह पुरूषांना अटक करण्यात आली. एकूण सात जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यात राकेश सचिन वाघरी, राजेंद्र भीमा काळे, अनिता संजय पवार, राजू बाबू राठोड, शिवराज लक्ष्मण पवार, कमळाबाई बाबू राठोड आणि सुमन राजू राठोड या आरोपींचा समावेश आहे. सर्व आरोपी हे नेरूळ रेल्वे स्टेशन सार्वजनिक पुलाजवळील झोपडीत वास्तव्यास होते. त्यांच्याविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी राजू राठोड याच्यावर यापूर्वीही नेरूळ पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील विशाल आणि गंगा काळे हे दोघे फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तसेच आरोपी राजू राठोड याचे भंगार दुकान अनधिकृत जागेवर असल्याने ते तिथून काढून टाकण्या बाबत नवी मुंबई महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.नवी मुंबईत अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरू असून अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका कायम राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world