राहुल कांबळे, नवी मुंबई
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी शेजारील उलवे-बेलापूर पुलाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोडाऊन उभारली आहेत. या गोडाऊनना नवी मुंबई पोलिसांच्या छत्रछायेखाली संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या गोडाऊनमधून सर्रास बेकायदेशीर कामकाज सुरू असून, पोलीस मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
सध्या या पुलाच्या शेजारीच आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाच्या परिसरात अशा बेकायदेशीर हालचाली सुरू असणे हा थेट राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे मानले जात आहे.
(नक्की वाचा- Nanded News: लोक बघत होते, व्हिडीओ काढत होते, 'तो' तिला पळवून नेत होता, अंगावर काटा आणणारा थरार)
नागरिकांनी व्यक्त केलेली भीती अशी की, उद्या एखादी दुर्घटना किंवा गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक रस्त्यांच्या खाली किंवा पुलाखाली कोणतेही अतिक्रमण अथवा गोडाऊन उभारणे गुन्हा मानला जातो. तरीही न्यायालयाच्या आदेशांचे उघडपणे उल्लंघन करून ही गोडाऊन चालवली जात आहेत.
(नक्की वाचा : 6 वर्षांची नवरी, 45 वर्षांचा नवरा! अफगाणिस्तानातील धक्कादायक प्रकार, तालिबाननं दिला अजब आदेश)
या गोडाऊन्समुळे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा भंग होत नाही, तर विमानतळ परिसरातील सुरक्षाही धोक्यात आली आहे. त्यामुळे बेकायदेशीर गोडावणे तात्काळ हटवावित आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. आता नवी मुंबई पोलिस या गंभीर प्रकरणावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.