Navi Mumbai News : नवी मुंबईत मुसळधार पावसात एका मोठ्या अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणी थोडक्यात बचावल्या आहेत. या दोन्ही विद्यार्थिनी महाविद्यालयातून घरी परतत होत्या. रस्त्यावर त्या चालत होत्या. त्याचवेळी असं काही घडलं की दोघीही पाण्यात पडल्या. यानंतर तातडीने दोघींनाही रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं, आता त्या धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या घटनेनंतर वीज विभाग आणि स्थानिक प्रशासनाचा दुष्काळजीपणा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थिनी महाविद्यालयातून घरी परतत होत्या. मुसळधार पाऊस सुरू होता. पावसातून जात असताना एका तरुणीचा पाय एका उघड्या विजेच्या तारेवर पडला. करंट लागताच परिसरात खळबळ उडाली. दोघी तरुणी रस्त्यावरील पाण्यात पडल्या. बराच वेळ त्यांना उठता येत नव्हतं. जखमी विद्यार्थिनींना तातडीने जवळील रुग्णालय के डी. वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थिनी शुद्धीत आल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र विजेचा झटका मोठा असल्याकारणाने पुढील २४ तास डॉक्टरांनी त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं आहे.
निष्काळजीपणावर महापौर संतापल्या...
या घटनेनंतर नवी मुंबई महानगरपालिकेकडून तातडीने कारवाई सुरू केली आहे. महापौर सुजाता पाटील म्हणाल्या की, भविष्यात अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत. त्या म्हणाल्या, निष्काळजीपणाबद्दल आम्ही एमएसईबी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तरांची मागणी करत आहोत. शहरात जिथे कुठे अशा उघड्या आणि धोकादायक विद्युत जोडण्या आहेत, त्यांची तत्काळ तपासणी करून दुरुस्ती करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.