'वन नेशन, वन इलेक्शन'वर बोलायचं; दुसरीकडे 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता येत नाहीत; शरद पवारांचा टोला

Sharad Pawar : निवडणूक आयोगाने 16 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकांचा घोषणा केली. मात्र महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केलेली नाही.

Advertisement
Read Time: 2 mins

संजय तिवारी, नागपूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे (राशप) अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या 'वन नेशन, वन इलेक्शन' धोरणाचा खरपूस समाचार घेतला आहे.  निवडणूक आयोगाने 16 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकांचा घोषणा केली. मात्र महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केलेली नाही. यावरुन वन नेशन, वन इलेक्शनबाबत बोलायचं आणि चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना सर्व देशांच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात अशी भूमिका मांडली. मात्र ती भूमिका मांडून 12 तास होत नाहीत तोच आपल्याला ऐकायला येते की, जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली, हरियाणाची झाली. मात्र महाराष्ट्र आणि झारखंडची झालेली नाही. देशात एकाच वेळी निवडणुकी घ्यायचं धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडत असताना महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भातील निवडणूक आयोगाचा निर्णय एकप्रकारचा विरोधाभास आहे", असं शरद पवार यांनी म्हटलं. 

महाराष्ट्राच्या निवडणुकांची तारीख जाहीर का झाली नाही?

केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, 'अगोदर महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका सोबत होत होत्या. मात्र तेव्हा जम्मू काश्मीर विधानसभा नव्हत्या. आम्ही यावेळेस हरयाणा आणि जम्मू कश्मीरच्या विधानसभा निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागणार आहे. महाराष्ट्रात आता पाऊस पडला आहे. गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री आणि दिवाळी असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. मात्र  विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच महाराष्ट्रात निवडणुका होतील.