NCP Merger: पटेल-तटकरेंना राष्ट्रवादीचे विलीनीकरण नकोय, हा अमित शाह-फडणवीसांचाच अजेंडा, सामना अग्रलेखातून टीका

NCP Merger: सामना अग्रलेखातून सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टिकास्त्र सोडण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
"NCP Merger: सामना अग्रलेखातून ताशेरे"
PTI

NCP Merger: सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यावर टीका करण्यात आलीय. अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता. त्यातूनच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा' आहे, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून ताशेरे ओढण्यात आले आहेत.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

- अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नाही तोच अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीने दुसरा धक्का दिला आहे. अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर संमिश्र लोकभावना आहेत. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या अशा भावना काही लोकांनी व्यक्त केल्या. हे पद काही कर्तृत्वाने मिळाले असे नाही. मात्र ही घडामोड नक्की कोणाच्या इच्छेने झाली? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. 

(नक्की वाचा: Ajit Pawar Video: अजित पवारांना असे पाहून रडू आवरणार नाही, जय पवार यांनी शेअर केला स्तब्ध करणारा व्हिडीओ)

- दादांच्या निधनानंतर पक्षात अस्वस्थता निर्माण झाली. पोशिंदा व पालक निघून गेल्याने पोरकेपणाची जाणीव वाटली. त्यानंतर काही जणांच्या महत्त्वाकांक्षांना उधाण आले व उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली. प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांच्यात वाद आहे. पवार-पाटलांचा पक्ष हा पटेलांचा पक्ष होऊ नये म्हणून काही जणांनी धावाधाव करून सुनेत्रा पवार यांना उपसिंहासनावर बसवले. याचा अर्थ, अजित पवारांचा पक्ष पुढे टिकेल व चालेल असे नाही. भरसागरात नौकेचा नावाडी निघून गेला आहे व नौकेतील प्रत्येक जण नौका आपापल्या पद्धतीने वल्हवत आहे. सुनेत्रा पवार यांना नावेत चढवल्याने नाव वादळातून बाहेर पडेल काय? अर्थात, या नावेला फडणवीस यांचे इंजिन आहे व इंजिनाचा ‘रिमोट'सुद्धा फडणवीसांकडे आहे. भविष्यात शिंदे व अजित पवार यांच्या पक्षांचे काय होईल ते समजून घेणे महत्त्वाचे आहे.  

(नक्की वाचा: Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली नसती तर मायलेकरांना वाळीत टाकलं असतं, कट्टर विरोधकाचा गंभीर आरोप)

- पुढील लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, पण 2029 ची विधानसभा भाजप ‘शत प्रतिशत' स्वबळावर लढणार, हे निश्चित आहे. त्याआधी शिंदे गट व अजित पवारांच्या पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील. त्या वेळीच सुनेत्रा पवार यांची खरी कसोटी लागेल. पटेल-तटकरे हे स्वतः निवडून येण्याची मारामार, तेथे पक्षाचे आमदार ते निवडून कसे आणणार? त्यामुळे शिंदे व सुनेत्रा पवारांचे पक्ष पूर्णपणे फडणवीस यांच्या मेहेरबानीवरच अस्तित्व टिकवू शकतील. 

- सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद म्हणजे शोभेचे ठरू नये. अजित पवारांचे कर्तृत्व, कष्ट करण्याची क्षमता, अफाट लोकसंग्रह व भाजपसमोर फार न झुकण्याची किमया त्या दाखवू शकल्या तर त्यांचे स्वतंत्र स्थान निर्माण होऊ शकेल. सुनेत्रा पवार हे कसे हाताळतात, ते पाहावे लागेल. खिडकी उघडली की, हवेबरोबर विषारी कीटकही आत येतात याचाही अनुभव सुनेत्रा पवार घेतील. कदाचित त्या ‘गुंगी गुडिया' न बनता प्रभावीपणे काम करतील. तेव्हा पटेल, तटकरे, भुजबळांची अडचण होईल. सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवार नाहीत. 

- अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता. त्यातूनच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा' आहे. अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबात व राज्याच्या घडामोडीत गुंता वाढला. गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे.