Dombivali News Today : रेल्वे क्रॉसिंगसाठी जुन्या रेल्वे फाटकापासून ये-जा करण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध करून द्यावा,या मागणीसाठी निळजे ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून रेल्वे प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सध्या उपलब्ध असलेला पर्यायी मार्ग गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असल्यामुळे अबालवृद्ध, महिला तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.विशेषतः पावसाळ्यात या मार्गावर पाणी साचत असल्याने वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात.पूर्वी रेल्वे फाटकाचा मार्ग स्थानिकांसाठी सोयीचा होता,मात्र तो बंद करून दूरचा मार्ग उपलब्ध केल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
28 मार्चपासून ग्रामस्थांचा बेमुदत आंदोलनाचा पवित्रा
या संदर्भात निळजे ग्रामस्थांनी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला आणि निवेदने दिली. तसेच डीआरएम यांचीही भेटही घेतली. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे अखेर 28 मार्चपासून ग्रामस्थांनी बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.या आंदोलनासाठी विविध राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
नक्की वाचा >> Jalgaon News: जळगावात मन सुन्न करणारी घटना! पती-पत्नीनं स्वत:च्या शेतात संपवलं जीवन, उंबराच्या झाडावर..
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करणार
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन या प्रश्नावर लवकर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. या आंदोलनात प्रकाश पाटील, डॉ.रमेश पाटील,तुकाराम पाटील,शरद पाटील,मुकुंद पाटील,बळीराम पाटील,पंढरीनाथ पाटील,रवींद्र पाटील,गजानन पाटील,जनार्दन पाटील, गिरीधर पाटील,गीता पाटील,रजनी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.