पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर एमआयडीसी परिसराला आज एका भीषण स्फोटाने हादरवून सोडले. 'केमेटक इंडस्ट्रीज' या रासायनिक कारखान्यात रिॲक्टरचा प्रचंड तीव्रतेचा स्फोट झाला. या दुर्घटनेत कारखान्यात काम करणारे दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने बोईसर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कारखान्यातील हा स्फोट इतका भयानक होता की, त्याचा आवाज आणि हादरा तब्बल दीड ते दोन किलोमीटर परिसरातील नागरिकांना जाणवला. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
(नक्की वाचा- तुकाराम मुंढेंना हलक्यात घेतलं; नरिमन पॉईंट येथील प्रसिद्ध हॉटेलसह 6 हॉटेल्सला दणका, FDA ची मोठी कारवाई)
अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल
स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कारखान्यात पुढील अनर्थ टाळण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. जखमी कामगारांना तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
तारापूर एमआयडीसीमध्ये दुर्घटनांचे सत्र सुरूच
तारापूर एमआयडीसीमध्ये रासायनिक कारखान्यांमधील स्फोट आणि दुर्घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. स्थानिक कामगार संघटना आणि नागरिकांमधून व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रियांनुसार, अनेक कारखान्यांमध्ये सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते.
(नक्की वाचा- VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये चमत्कार! अमृतकुंडातील लुप्त झालेल्या प्राचीन शिवलिंगाचे अचानक दर्शन)
रासायनिक प्रक्रिया करताना घ्यायची काळजी आणि रिॲक्टरचे नियमित ऑडिट न केल्यामुळेच असे अपघात वारंवार घडत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने आता केवळ नोटीस न बजावता, दोषी कारखानदारांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world