Pune News: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं होतं. अशा आपत्कालीन परिस्थितीतही कॉर्पोरेट कंपन्यांमधील काही मॅनेजर्स कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा कामाला कसे प्राधान्य देतात, याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. रस्ते बंद असतानाही एका मॅनेजरने कर्मचाऱ्याची रजा नाकारत त्याला थेट 'उबर किंवा रिक्षा पकडून ऑफिस गाठा' असा अजब सल्ला दिला. या संतापजनक संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित कर्मचारी आता नोकरी सोडण्याच्या विचारात आहे.
नेमका काय आहे व्हॉट्सॲप संवाद?
हा संपूर्ण प्रकार 'r/Pune' या रेडिट सबपेजवर एका युझरने शेअर केला आहे. पीडित कर्मचाऱ्याच्या मित्राने हा स्क्रीनशॉट पोस्ट करत, "माझा मित्र विचारत आहे की त्याने आता नोकरीचा राजीनामा द्यावा का?" असे कॅप्शन दिले होते.
कर्मचारी: "हॅलो सर, मुसळधार पाऊस आणि रस्ते बंद असल्यामुळे मी आज ऑफिसला येऊ शकणार नाही."
मॅनेजर: "हाय, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा."
मॅनेजर पुढे म्हणाला: "मी तुमची रजा मंजूर करू शकत नाही. आपण सगळेच आज ऑफिसला आलो आहोत. इतर लोकही प्रवास करून ऑफिसला पोहोचले आहेत."
मॅनेजरचा अजब सल्ला: "तुम्ही रिक्षा किंवा उबर करा, पण काहीही करून आज ऑफिसला पोहोचा."
(नक्की वाचा- Marathwada News: जमिनीतून मोठा गूढ आवाज अन् हादरे; नागरिकांची मध्यरात्री पळापळ, 3 जिल्ह्यांमध्ये खळबळ)
सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप
हा स्क्रीनशॉट समोर आल्यानंतर रेडिट आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांनी मॅनेजरच्या या असंवेदनशील भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युझरने लिहिले, "अशा कंपन्यांचे नाव जाहीर करून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले पाहिजे." दुसऱ्या एका युझरने आपला अनुभव शेअर करत लिहिले, "माझ्या 6 हजार रुपये स्टायपेंड देणाऱ्या बॉसनेही मला असंच सांगितलं होतं. मी त्याला उत्तर दिलं होतं की, 'या अवाढव्य स्टायपेंडमध्ये मी उबरचा विचारही करू शकत नाही!'"
(नक्की वाचा- बीड हादरलं! उचलीसाठी ऊसतोड मजुराचे अपहरण, 4 दिवस डांबून अमानुष छळ; तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप)
या घटनेने कॉर्पोरेट जगतातील 'टॉक्सिक वर्क कल्चर' पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. मुसळधार पाऊस आणि आपत्तीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या जिवाची पर्वा न करता ऑफिसला येण्याची सक्ती करणाऱ्या अशा व्यवस्थापकांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशीही मागणी आता जोर धरत आहे.