पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्याची घटना घडली आहे. काल 15 जूनच्या सायंकाळी हा प्रकार घडला आहे. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी पुलावर मोठ्या संख्येने पर्यटक होते. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. कुंडमळा पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले नव्हते. सार्वजनिक बांधकाम खात्याने ग्रामपंचायतीला दोन वर्षांपूर्वीच पुलाची दुरुस्ती करून पर्यटकांना बंदीचा प्रस्ताव दिला होता.
गेल्या काही महिन्यांत कुंडमळा या भागात पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दर शनिवार, रविवारी आठ हजार लोक येथे येत होते. या पुलावरून त्यांचा प्रवास सुरूच होता. या पुलाची तितकी क्षमता नव्हती. तीन वर्षांपूवी यावर खड्डे पडले होते. दुचाकी आदळत होत्या. त्यामुळे तो धोकादायक बनला होता. त्यावर सिमेंटचे गट्टू टाकले होते. हा पूल ४७० फुटांचा आहे. यामध्ये पहिला 70 ते 80 फुटांवर दगडी चढ केला होता. त्यानंतर लोखंडी शंभर फुटांचा एक आणि दुसरा शंभर फुटांचा लोखंडी आणि दोनशे फुटांचा सिमेंटचा चढ आहे. या पुलाची आतली रुंदी चार फुटांची होती.
नक्की वाचा - Devendra Fadnavis: इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 2 जणांचा मृत्यू,मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे, काल सायंकाळपर्यंत हा आकडा दोनपर्यंत होता. तर धर्मदाय रुग्णालय मायमर येथे 18 जण उपचार घेत आहेत. याव्यतिरिक्त खासगी पवना रुग्णालयात चार, अथर्व रुग्णालयात १७ पर्यटक उपचार घेत आहेत, असे एकूण ३९ जणांवर उपचार सुरू आहे.
घटना घडण्यापूर्वी ग्रामस्थांनी केला होता फोन
स्थानिक रहिवासी गणेश भेगडे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला पुलाच्या दुर्घटनेपूर्वी फोन केला होता. साडेबारा वाजेपासून गर्दी वाढली होती. त्यांनी गर्दी वाढल्याचे पोलिसांना कळवले होते. त्यानंतर ३ मार्शल यामध्ये २ लेडीज कॉन्स्टेबल आणि १ पुरुष हवालदार आले होते. त्यांनी पर्यटकांना बाजूला केल्यानंतर लोक निघून गेले. मार्शल निघून गेल्यानंतर पर्यटक पुन्हा पुलावर जमा झाले होते.