लोकसभा निवडणूक घोषणेच्या काही दिवसात पुण्यातून आचारसंहिता भंगाच्या 46 तक्रारी, जिल्हाधिकारी अलर्टवर

आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघात 135 भरारी पथके, 129 स्थिर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारींसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा संपर्क केंद्र सुरू करण्यात आलं आहे. केंद्राकडे आणि पोर्टवर आलेल्या 46 तक्रारींपैकी 35 तक्रारींवरील कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. पैकी 11 तक्रारींवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली आहे. 

आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघात 135 भरारी पथके, 129 स्थिर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 16 मार्चपासून पर्वती विधानसभा मतदार संघात 18, कसबा -6, पुणे कॅन्टोन्मेंट आणि मावळ 4, कोथरूड आणि चिंचवड-3, पुरंदर, वडगाव शेरी, बारामती, खडकवासला आणि पिंपरी प्रत्येकी 1, तर चुकीच्या तक्रारी 3 अशा एकूण 46 तक्रारी सी-व्हीजील पोर्टलवर दाखल झाल्या. त्यापैकी 35 तक्रारींवर त्वरित कारवाई  करण्यात आली. उर्वरित 11  तक्रारी संदर्भात  कार्यवाही सूरू आहे. 

जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघात 135 भरारी पथके व 129 स्थिर पथके नियुक्त केली आहेत. या पथकामार्फत सी-व्हीजील पोर्टलवर प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्यात येत आहे. 

Advertisement

आलेल्या तक्रारींमध्ये अधिकतर विनापरवानगी लावण्यात आलेले बॅनर आणि पोस्टरबाबत आढळून आल्या आहेत. यापुढेही नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास सी- व्हिजिल पोर्टल, 18002330102 आणि 1950 टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकता. या कक्षाद्वारे तातडीने तक्रारींची दखल घेण्यात येईल. हा कक्ष 24 तास सुरू राहणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला आलेल्या तक्रारीनुसार भरारी पथके आवश्यक कारवाई करतील, अशी माहिती नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली आहे. 

Advertisement