- अटल सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडणाऱ्या एलिव्हेटेड कनेक्टरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे
- फेब्रुवारी २०२७ पर्यंत हा ७.३५ किलोमीटर लांब कनेक्टर प्रवाशांसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे
- प्रकल्पासाठी १७६ पैकी १४३ पायाभरणी, १४१ खांब उभे असून ६५३ गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे
मुंबई पुण्यातलं अंतर अजून कमी होणार आहे. दक्षिण मुंबईतून पुणे आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'एलिव्हेटेड कनेक्टर'चे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या प्रकल्पाची डेडलाइन जाहीर केली आहे. या तारखे नुसार फेब्रुवारी 2027 पर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे सुसाट प्रवास करता येणार आहे. हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प समजला जात आहे.
एमएमआरडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 176 पैकी 143 पायाभरणीची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच 141 पियर (खांब) उभे राहिलेआहेत. 830 पैकी 653 गर्डर बसवण्याचे कामही यशस्वीरीत्या पार पडले आहे. सध्या पनवेलजवळील पळस्पे येथे सर्विस रोडच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. हा संपूर्ण मार्ग 'उन्नत' (Elevated) स्वरूपाचा असल्याने जमिनीवरील वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. शिवाय या मार्गावरून ज्याला कुणाल गोव्याच्या दिशेने जाता येईल त्यांना गोव्याला जाता येईल. तर ज्यांना पुण्याला जायचं आहे त्यांना थेट मुंबई पुणे एक्सप्रेस वे ला हा मार्ग जोडला जाणार आहे.
सध्या मुंबई ते पुणे प्रवासासाठी वाहतूक कोंडीमुळे साधारणपणे 2 ते 2.5 तास लागतात. मात्र, हा 7.35 किमी लांबीचा सहा पदरी कनेक्टर पूर्ण झाल्यावर हा प्रवास केवळ 90 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल. MMRDA ने तसा दावा ही केला आहे. हा मार्ग पळस्पे येथून सुरू होऊन चिरले येथे अटल सेतूला जोडला जाईल. यामुळे जेएनपीटी (JNPT) आणि नवीन होत असलेल्या नवी मुंबई विमानतळालाही थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई पनवेल यांच्यातील अंतर ही कमी होणार आहे. दक्षिण मुंबई थेट नवी मुंबई आणि पनवेलला जोडणार आहे.
"या नवीन कनेक्टरमुळे प्रवाशांना एकाही सिग्नलचा अडथळा न येता थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर पोहोचता येईल. दक्षिण मुंबईतून बाहेर पडणाऱ्या वाहनांसाठी हा एक हाय-स्पीड कॉरिडोर ठरेल," असे एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे विशेषतः शनिवार-रविवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर अधिक सुसह्य करण्यासाठी एमएमआरडीएने हाती घेतलेल्या अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग कनेक्टरचे काम प्रगत टप्प्यावर पोहोचले आहे. फेब्रुवारी 2027 पर्यंत हा उन्नत मार्ग वाहतुकीसाठी सज्ज होणार असून, यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world