- कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील फर्निचर शोरूममध्ये १० ते १२ फुटी महाकाय अजगर शिरल्याची घटना घडली आहे
- अजगर शोरूममध्ये शिरल्यावेळी काही कामगार गाढ झोपेत होते, ज्यांना नागरिकांनी जागे केले आणि सुरक्षित बाहेर काढले
- वॉर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत अजगराला कौशल्याने पकडून वन विभागाला सुपूर्द केले
अमजद खान
एक अशी घटना ज्याने सर्वांनाच हादरवून टाकणार आहे. कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात एका फर्निचरच्या शोरूममध्ये 10 ते 12 फुटी महाकाय अजगर शिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, ज्या वेळी हा अजगर शोरूममध्ये शिरला, तेव्हा काही कामगार तिथे गाढ झोपेत होते. कल्याणमधील गांधारी परिसरात मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यात फर्निचर शोरूममध्ये महाकाय अजगर शिरल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. 'वॉर फाउंडेशन'च्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत अजगराला सुरक्षित पकडले. वाढते शहरीकरण वन्यजीवांच्या मुळावर येत असल्याची चर्चा या निमित्ताने स्थानिकांमध्ये रंगली आहे.
गांधारी परिसरात रस्त्यावरून जात असताना नागरिकांना एक भलामोठा अजगर दिसून आला. हा अजगर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या फर्निचर शोरूममध्ये शिरला. शोरूमचे शटर उघडे असल्याने तो सहज आत गेला. त्यावेळी आत काही कामगार झोपलेले होते. बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी तातडीने आरडाओरडा करत कामगारांना जागे केले. रात्रीची वेळ असल्याने कामगारांना ही चांगली झोप लागली होती. पण आरडाओरडा वाढल्याने ते ही जागे झाले. त्यानंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढले. ज्या वेळी त्यांना समजले की दुकानात अजगर शिरला आहे त्यावेळी भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले.
यावेळी सर्पमित्रांना याबाबत कळवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच 'वॉर (W.A.R) फाउंडेशन'चे सदस्य प्रेम आहेर आणि तन्मय माने आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. तिथे लोकांनी आधीच मोठी गर्दी केली होती. अशा स्थितीत त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितरीत्या या अजगराला पकडले. पकडलेल्या अजगराला नंतर सुरक्षितपणे वन विभाग आणि अग्निशमन दलाच्या ताब्यात देण्यात आले. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. असं असलं तरी मानवी वस्तीत वन्य प्राणी शिरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ही बाब जास्त धोकादायक बनत चालली असल्याचं स्थानिकांचे मत आहे.
गांधारी परिसरात गेल्या काही दिवसांत अजगर आढळण्याची ही तिसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच एका नागाच्या दंशामुळे तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला होता. वाढते शहरीकरण आणि वन्यजीवांच्या अधिवासावर झालेले अतिक्रमण यामुळे हे प्राणी आता मानवी वस्तीकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे थंड जागेच्या शोधात हे साप बाहेर पडत असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी ही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय अशा पद्धतीचे जीव आढळल्यास याची माहिती वन विभाग किंवा सर्प मित्रांना द्यावी अशा सुचना ही करण्यात आल्या आहे. कुणी ही घाबरून जावू नये असं ही सांगण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world