राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे 26 ते 28 सप्टेंबर या तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर होते. यावेळी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या आवाहनानुसार विविध संस्था, नागरिकांकडून सामाजिक बांधिलकी जपत अवघ्या तीन दिवसात 27 लाख 52 हजार 300 रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केली, याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना 15 लाख रुपये, नवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, करंजे 2 लाख 50 हजारांची मदत केली. मात्र दोन चिमुकल्यांनी सर्वांनची मन जिंकली. त्यांनी चक्क आपले खाऊचे पैसे पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवू केले.
ज्यांनी मदत केली त्यात अक्षय शिंदे फाऊंडेशन 2 लाख, बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ 1 लाख, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती लाख, शंकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था 1 लाख, संदीप जगताप आणि भारत गावडे यांनी प्रत्येकी एक लाख, बारामती सराफ असोसिएशन 75 हजार, पंकज निलाखे यांनी 51 हजार, श्रीपाल नागरी पतसंस्था 51 हजार, बारामती तालुका मराठा सेवा संघ 25 हजार, नितीन आटोळे 25 हजार रुपये, बारामती तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन 21 हजार, अजयश्री बिगर ग्रामीण सहकारी पतसंस्था, मुरुम 21 हजार रुपये, बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना 11 हजार, छत्रपती शिवाजी महाराज विकास सोसायटी 10 हजार, सुनील राजेभोसले 10 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
नक्की वाचा - Dombivali News: ती रडत होती मात्र सांगू शकत नव्हती, जेव्हा खरं कारण समजलं तेव्हा...
पण सर्वांची मनं जिंकली ती दोन चिमुकल्यांनी. ते म्हणाले आम्हाला नाही तर आमच्या शेतकरी बांधवांना खाऊची गरज आहे. असं म्हणत करंजेपुल येथे राजनंदिनी आणि राजवीर मालेगावकर यांनी आपल्या खाऊचे साठवलेले पैसे पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवू केले. आम्हाला नाही तर आमच्या शेतकरी बांधवांना खाऊची गरज असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हे पैसे दिले. या दोघांनी 2 हजार 300 रुपये खाऊसाठी साठवले होते. त्यांनी हे सर्व पैसे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे दिले. त्याबद्दल अजित पवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करुन कौतुक केले.
राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून या संकटकाळात राज्य शासनाच्यावतीने नागरिकांना धीर देत त्यांचे जीवनमान पूर्वपदावर आण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक संस्था पुढे येऊन सढळ हाताने मदत करीत आहे, संकटाच्याकाळात एकमेकांना मदत करणे ही आपल्या राज्याची परंपरा व संस्कृती आहे. आगामी काळातही पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहन पवार यांनी केले.