- पांडवकालीन बारव मंचर येथे असून त्याजवळील दर्गा अनधिकृत असल्याचा वाद निर्माण झाला आहे
- खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह बारव येथे आरती केली आणि दर्गा हटवण्याची मागणी केली
- बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बारव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे
अविनाश पवार
पांडवकालीन बारव पुणे जिल्ह्यातील मंचर येथे आहे. या बारवच्याच बाजूला दर्गा देखील आहे. यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. या ठिकाणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह भेट देत आरती केली होती. तसेच संबंधित दर्गा अनधिकृत असून तो हटवण्यात यावा, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. शिवाय या जागेवर ही हिंदूत्ववादी संघटनांनी दावा केला होता. आता बकरी ईद होत आहे या पार्श्वभूमीवर या बारव जवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
नक्की वाचा - Bakrid 2026: ना कुर्बानी ना नमाज! बकरी ईद देशभर साजरी होत असली तरी 'हे' शहर आहे अपवाद
या जागेवर पांडवकालीन बारव असल्याच्या ऐतिहासिक नोंदी असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात आहे. या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. बकरी ईद निमित्त मुस्लिम संघटनांना आणि वक्फ बोर्डाकडून येथे नमाज पठणासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याला हिंदूत्ववादी संघटनांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये भाजप आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हा मोर्चा निघाल्यास शहरात तणाव निर्माण होवू शकतो. त्यामुळे हा संभाव्य तणाव लक्षात घेता प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय बारव आणि परिसरात येण्यास ही बंदी करण्यात आली आहे. हिंदू संघटना पांडवकालीन बारवसाठी प्रचंड आक्रमक झाले आहेत. पण त्यावर सध्या वक्फ बोर्डाचा ताबा आहे. ही जमिन वक्फ बोर्डाच्या ताब्यातून काढून घेतली जावी अशी मागणी जोर धरत आहे. अशा स्थितीत इथं परिस्थिती चिघळणार नाही याची दक्षता पुणे ग्रामिणचे पोलीस घेत आहेत. या आधी ही मंचरमध्येच मशिदी खाली भूयार सापडले होते. त्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी ही तणाव निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर तो वाद ही निवळला. आता बारव वरून मंचरचे वातावरण तापले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world