सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ७ जुलै २०२६ रोजी देहू येथून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होईल. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही देहू येथे मोठ्या संख्येने वारकरी जमा होतील. मात्र त्यापूर्वीच एका धक्कादायक घटनेनं चिंता वाढली आहे.
इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत्यूमुखी...
संत तुकारामांचा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना श्रीक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या अधिक मास सुरू आहे. त्यानिमित्ताने सध्या देहूत भाविकांची मोठी गर्दी असताना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसत आहेत. काही मृत माशांच्या अंगावर किडे पडल्याचंही समोर आल्याने पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परिणामी संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
नदी स्वच्छतेच्या नावाखाली दरवर्षी लाखोंचा खर्च...
नदी स्वच्छतेच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत असतानाही अशी परिस्थिती ओढावल्याने स्थानिक नागरिक आणि वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पुढाकार घेत नदीतील मृत मासे बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावली. मात्र, आगामी पालखी सोहळा पाहता लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील बनला आहे. याप्रकरणी नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करावी आणि इंद्रायणी नदी स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता वारकरी आणि विविध सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे.