- पुण्याच्या दौंड तालुक्यातील ग्राहकाने इंदापूर येथील गॅस वितरण केंद्रातून घेतलेल्या सिलिंडरमध्ये पाणी
- सिलिंडर जोडल्यावर फक्त दोन ते तीन दिवसांत गॅस संपल्याने ग्राहकांना सिलिंडरची तपासणी करण्यास भाग पाडले
- सिलिंडरची टाकी उलटी केल्यावर आणि वाल्व्ह दाबल्यावर पाणी बाहेर पडल्याचा ग्राहकाचा दावा
देवा राखुंडे
सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे. त्यामुळे गॅस कसा मिळेल या चिंतेत अनेक जण आहेत. अशा स्थितीत पुण्याच्या इंदापुरातून एक अजब प्रकार समोर आला आहे. दौंड तालुक्यातील राजेगाव येथील रतन गोसावी या ग्राहकाने इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील गॅस वितरण केंद्रामधून घरगुती वापराचा सिलेंडर घेतला होता. हा सिलेंडर जोडल्यानंतर केवळ दोन ते तीन दिवस वापरला आणि त्यानंतर मात्र या सिलिंडरच्या टाकीतील गॅस संपला. आता दोन दिवसापूर्वी जोडलेला सिलेंडर लगेच कसा संपला म्हणून ग्राहकांना टाकीची चाचपणी केली. यावेळी अर्ध्यापेक्षा जास्त या टाकीमध्ये पाणी असल्याचा दावा रतन गोसावी यांनी केला आहे.
गणेश गोसावी हे दौंड तालुक्यातील राजेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या आई रतन गोसावी यांच्या नावावर गॅसचे कनेक्शन आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील अंजली इण्डेन गॅस या वितरण केंद्रातून सिलिंडरची खरेदी केली होती. त्यानंतर हा सिलिंडर त्यांनी आपल्या घरी जोडला. पण झालं असं की सिलिंडर जोडल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीच गॅस संपला. गोसावी यांना प्रश्न पडला की काल-परवाच सिलिंडर जोडला आहे मग गॅस संपला कसा ? यावर माय लेकरात चर्चा झाली. त्यांच्या आई रतन गोसावी यांनी गणेश यांना सिलेंडरची टाकी उलटी करून बघ असं सांगितलं.
यावर गणेश यांनी संबंधित टाकी ही हलवून पाहिली असता त्यामध्ये द्रव पदार्थ असून त्याचा आवाजही येत होता. असं असताना मग तो गॅस जळत का नाही असा प्रश्न पडला. यानंतर गणेश गोसावी यांनी मोटरसायकलच्या चावीने सिलेंडरचा वाल्व्ह दाबून पहिला असता त्यातून चक्क पाणी बाहेर आल्याचा दावा या ग्राहकाने केला आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी हा संपूर्ण प्रकार गोसावी यांनी गॅस वितरण केंद्राच्या व्यवस्थापनाला सांगितला. त्यावर तुम्ही एजन्सीला सिलिंडर घेऊन या टाकी जेवढे पाणी असेल तेवढा गॅस तुम्हाला देऊ असं त्यांना सांगण्यात आल्याचा दावाही गोसावी यांनी केला आहे.
मात्र या संपूर्ण प्रक्रियेत गोसावी यांना प्रचंड मनस्ताप झाल्याचेही ते म्हणतात. प्रत्येक वेळी सिलिंडर खरेदीसाठी त्यांना होम डिलिव्हरी मिळत नाही. गॅस खरेदीसाठी त्यांना अगोदर भिगवण येथील केंद्रात यावा लागते. तिथे नोंद करावी लागते. त्यानंतर मग गोडाऊनला गॅस खरेदीसाठी जावा लागते. गोसावी यांच्या घरापासून हे अंतर तब्बल बारा किलोमीटरच आहे. अशात या टाक्यांमध्ये जर असं पाणी निघालं तर मग आम्ही काय करायचं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world