देवा राखुंडे
Purandar Airport: पुण्याच्या विकासात महत्वाचं ठरणारे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या वादात सापडले आहे. या विमानतळ प्रकल्पालाच ब्रेक लागतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. विमानतळासाठी जमीन देण्यास पारगावच्या ग्रामस्थांनी आता ठाम नकार दिला आहे. त्यामुळे विमानतळाचं काम पुन्हा थांबण्याची शक्यता आहे. पुण्यातील पुरंदर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला पुन्हा एकदा ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे हे मोठे विमानतळ असणार आहे.
नवी मुंबईनंतर हे सर्वात मोठे विमानतळ असेल. हे विनामतळ पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी वरदान ठरणार आहे. पण पारगाव मेमाणे येथील गावकऱ्यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर झालेल्या ग्रामसभेत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपली जमीन न देण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. प्रशासनाने भूसंपादनासाठी जवळपास 4285 कोटी रुपये खर्चाचे नियोजन केले आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी 'जमीन नाही, तर विकास नाही' अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रशासना समोरच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.
या विमानतळासाठी 94 टक्के संमती झाल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता. परिस्थिती थोडी वेगळी आहे. पुरंदरमधील 7 गावांतील 2832 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित होणार आहे. जिल्हा प्रशासन सांगते की, जवळपास 94 टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. पण, पारगाव मेमाणेच्या ग्रामस्थांनी एकत्र येत या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावकरी आता थेट सरकारशी बोलणार नाहीत, तर यासाठी एक कृती समिती (Action Committee) नेमण्यात येणार आहे.
याच समितीमार्फत सर्व मागण्या आणि चर्चा होणार आहेत. मोजणीचं कामही अडकल आहे. विरोधामुळे पारगाव येथील 64 हेक्टर जमिनीची मोजणी (Survey) देखील थांबली होती. ती आता पुढच्या 2 दिवसांत पूर्ण केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. या विमानतळामुळे पुण्याच्या IT क्षेत्राला मोठी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. येथे दरवर्षी 75 लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. तसेच, 4000 मीटर लांब दोन समांतर धावपट्ट्या (Runways) तयार होणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world