दिल्लीत नीट (NEET) पेपर लीकप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकाच मंचावर आले आहेत. शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, पोलीस प्रशासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर जोरदार घणाघात केला. यावेळी ठाकरे बंधूंनी येत्या रविवारी, 26 जुलै रोजी मुंबईत विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी एका भव्य निषेध मोर्चाची अधिकृत घोषणा केली.
26 जुलैचा मोर्चा कसा असेल?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मोर्चाची रूपरेषा स्पष्ट केली, हा शक्तीप्रदर्शन मोर्चा रविवारी दादर येथील शिवतीर्थावरून (शिवाजी पार्क) निघेल आणि श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईल. "विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचे काम केंद्राकडून सुरू आहे. ही नीट पेपर लीक होण्याची तिसरी वेळ आहे. या सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून आम्ही सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहोत," असे राज ठाकरे म्हणाले.
(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')
"आधी काँग्रेसच्या काळात देखील असे मोर्चे निघाले. त्यावेळी देखील अनेक नेत्यांनी राजीनामे मागितले आणि तेव्हा ते दिले गेले. मात्र आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापासून सुरू झालेला हा प्रश्न आता थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. पंतप्रधान मोदींनी आंदोलकांशी आधीच चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती," असेही राज ठाकरे म्हणाले.
'संसद आणि न्यायालयांचे धृतराष्ट्र झालेय'
उद्धव ठाकरे यांनी पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर अत्यंत आक्रमक भाषेत टीका केली. "दिल्लीत आंदोलक मुलींना लाठ्या-काठ्यांनी मारले गेले, खिळे लावून मारहाण झाली, कपडे फाडले गेले. सिव्हिल ड्रेसमधील गुंडांच्या हातात पोलिसांच्या काठ्या कशा आल्या? हे आंदोलन मोडण्यासाठी भाजपने काय पाकिस्तानमधून लोक आणले होते का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
(नक्की वाचा- Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल; 'हे' आहेत पर्यायी मार्ग पाहा)
"न्यायाधीशांना कुत्रे आणि कबूतरांच्या याचिकांवर लक्ष द्यायला वेळ आहे, पण देशाचे भविष्य असलेल्या या 'झरळांकडे' विद्यार्थ्यांकडे पाहायला वेळ नाही. ही न्यायव्यवस्था धृतराष्ट्र होऊ लागली आहे," असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. या रविवारी देशाची ताकद दाखवण्यासाठी सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.