आर्थिक अडचणी, अपुरे प्रशिक्षण आणि खेळण्यासाठी मैदानांचा अभाव यांसारख्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबईतील चाळीत वाढलेल्या 7 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात भारताची पताका फडकावली आहे. भूतानमध्ये पार पडलेल्या दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिपमध्ये या सातही खेळाडूंनी सुवर्णपदकावर नाव कोरत भारताला विजेतेपद मिळवून दिले. या दुर्लक्षित खेळाडूंच्या उत्तुंग यशाची दखल घेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
सुवर्णपदक विजेते मुंबईचे '7 चॅम्पियन्स'
चाळीतील अरुंद जागा आणि सार्वजनिक मैदानांचा वापर करत या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकवला. या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत.
- विराज भिलारे
- गौरव सोनावणे
- ऋग्वेद राहुल मोहिते
- प्रथमेश चव्हाण
- श्री धाधम
- प्रथमेश पगारे
- ऋषभ इंगळे
या खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, मेहनत आणि खेळाप्रती असलेली निष्ठा आजच्या युवा पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
"प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा प्रेरणादायी प्रवास" - रविंद्र चव्हाण
सामाजिक आणि राजकीय विषयांवर सोशल मीडियावरून नेहमी सक्रिय असणाऱ्या आमदार रविंद्र चव्हाण यांनी या खेळाडूंच्या जिद्दीची दखल घेत लिहिले की, मर्यादित सुविधा आणि आर्थिक अडचणींमधून मार्ग काढत या सात सुपुत्रांनी भूतानमधील दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताला चॅम्पियन बनवले आहे. त्यांच्या या यशाचा संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला सार्थ अभिमान आहे.
एरवी क्रिकेट किंवा इतर ग्लॅमरस खेळांना मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या तुलनेत अशा दुर्लक्षित खेळांमधील खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याबद्दल रविंद्र चव्हाण यांच्या पोस्टचे सोशल मीडियावर नागरिक आणि क्रीडाप्रेमींकडून जोरदार स्वागत केले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world