Mohan Bhagwat Gen Z statement : आंदोलन करणे म्हणजे नवीन पिढी किंवा Gen-Z राष्ट्रविरोधी आहे असा अर्थ होत नाही, असे सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट केले आहे. तरुणांशी संवाद साधताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनांचे समर्थन करत लोकशाहीत आंदोलन हे संवादाचेच एक माध्यम असल्याचे सांगितले. देशातील आजची युवा पिढी आपल्या हक्क आणि प्रश्नांसाठी प्रश्न विचारत असून, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठवणे ही त्यांची योग्य तक्रार आहे, अशी महत्त्वाची भूमिका भागवत यांनी मांडली.
काय म्हणाले सरसंघचालक?
नवीन पिढी आणि जुन्या पिढीतील फरकावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, पूर्वीची पिढी मोठ्यांचे ऐकून घेत असे, परंतु आजची तरुण पिढी उत्तर मागते. जर नाते टिकवायचे असेल तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. भारतीय परंपरेत याला 'शास्त्रार्थ' असे म्हटले जाते आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.
तरुणांनी आंदोलन करू नये असे मी म्हणणार नाही, पण ते कसे आणि कोणत्या मार्गाने करायचे याची नियमावली संविधानात दिलेली आहे. तरुण आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत असतील तर समाज आणि प्रशासनाने त्यामागील कारणांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
( नक्की वाचा : RSS ला पैसा नक्की कुठून मिळतो? गुरुदक्षिणेवर टॅक्स का लागत नाही? कसं चालतं संघाचं काम? वाचा सर्व माहिती )
शिक्षणाच्या बजेटवर सरसंघचालकांची भूमिका काय?
देशातील शाळांमध्ये शौचालय आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांच्या अभावावर बोलताना भागवत यांनी शिक्षण व्यवस्थेच्या व्यापारीकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षण हा कोणताही व्यावसायिक धंदा नसून मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाला शिक्षण मिळेल अशी संरचना तयार झाली पाहिजे.
अनेक दशकांपासून देशातील शिक्षण व्यवस्थेवर GDP च्या 6 टक्के खर्च करण्याची मागणी केली जात असून, संघही या मागणीचे पूर्ण समर्थन करतो असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ शाळा चालवून पैसे कमावणे हा शिक्षणाचा हेतू नसून, नवीन पिढी घडवणे हाच मूळ उद्देश असायला हवा, असे भागवत यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Mohan Bhagwat : 'हम दो, हमारे तीन'ची वेळ आली!लोकसंख्या धोरणावर RSS प्रमुख मोहन भागवत यांचा नवा फॉर्म्युला )
शिक्षक प्रशिक्षण आणि समाजाच्या सहभागावर भर
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांचे योग्य प्रशिक्षण होणे सर्वात आधी गरजेचे असल्याचे भागवत यांनी सांगितले. तसेच शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी केवळ सरकारवर सोडून चालणार नाही, तर समाजानेही पुढे आले पाहिजे. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शाळांची दुरुस्ती केली आहे, तर शहरांमधील लोकांच्या मदतीने ग्रामीण शाळांमध्ये संगणक पोहोचवले आहेत. त्यामुळे सरकार आणि समाज या दोघांनी मिळून देशातील शिक्षण व्यवस्था मजबूत केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world