Mumbai Political News : आगामी मुंबई महापालिकेच्या आधी नवीन युती राज्याच्या राजकारणात उदयास येणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी निवडणुकीआधी एकत्र येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ठाकरे गट आणि मनसे दोन्हीकडून याबाबत थेट वक्तव्य केली जात आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील, ठाकरे गटाने प्रस्ताव दिला तर राज ठाकरे विचार करत असं म्हटलं आहे.
संदीप देशपांडे यांनी ठाकरे गट-मनसेच्या युतीवर म्हटलं की, सकारात्मक आहोत, सकारात्मक आहोत असं आम्ही रोज रोज बोलून काही होणार नाही. ज्यावेळी प्रस्ताव येईल तेव्हा राज साहेब निर्णय घेतील. जो पर्यंत प्रस्ताव येत नाही तो पर्यंत काही बोलता येत नाही. आमची जीभ 2014 आणि 2017 ला जीभ पोळली आहे. त्यामुळे आम्ही ताक फुंकून पित आहोत, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदा युतीबाबत सूचक विधान केले होते. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी भांडणे आणि वाद क्षुल्लक आहेत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणे कठीण नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील युतीच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
(नक्की वाचा- Maharashtra Politics: 'महायुतीत नाराजीनाट्य, 3 पक्षांचा तमाशा..', ठाकरे गटाची टीका)
युती झाल्यास महापालिका निवडणुकीवर परिणाम
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही पक्षांचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मनसे ठाकरे गट एकत्र आल्यास दोन्ही पक्षांची मराठी मतांची टक्केवारी निर्णायक ठरू शकते. शिवसेना मनसे युती झाल्यास महायुती आणि इतर पक्षांना आव्हान निर्माण होऊ शकते. याशिवाय मनसेृ-ठाकरे गट युतीमुळे महाविकास आघाडीला बळ मिळू शकते.