राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai Crime News : नवी मुंबई उलवे परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आज गुरुवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळं संपूर्ण परिसर हादरला आहे. येथे राहणाऱ्या एका नेपाळी कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून इतर 4 जणांवर वाशीतील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नेपाळी उलवेतील जावळे गाव परिसरात मागील पाच वर्षांपासून राहत होतं, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
या भयंकर घटनेमागचं नेमकं कारण काय?
उलवे पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना घरातील दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता,घरातील पाचही सदस्य बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर जखमींना नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु, डॉक्टरांनी 22 वर्षीय युवकाला मृत घोषित केलं. सूत्रांच्या माहितीनुसार, मृत युवक एका हॉटेलमध्ये काम करत होता.दरम्यान,इतर चार जणांमध्ये दोन पुरुष,एक महिला आणि दोन लहान मुले आहेत.त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा >> KDMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'हा बडा नेता भाजपच्या गळाला?
या घटनेमागे नेमकं कारण काय आहे?हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय. या लोकांचा मृत्यू विषबाधेतून झाला असावा, अशीही चर्चा आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अन्नपदार्थ आणि घरातील वस्तूंचे नमुने तपासासाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेमुळे जावळे गाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अशा घटना टाळण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. उलवे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटलंय की, ही आत्महत्या आहे की विषबाधा? हे तपासानंतरच स्पष्ट होईल. आम्ही सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
नक्की वाचा >> 72 तोफांची 'सलामी'! वर्ल्ड रेकॉर्ड करून रचला इतिहास, भारताची धडाकेबाज फलंदाज प्रतिका रावल आहे तरी कोण?