देवा राखुंडे, बारामती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी देखील याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवारांना याबाबत अनेकदा विचारणा केली. मात्र त्यांनी अशी कुठलीही चर्चा सुरु नसल्याचं प्रत्येकवेळी सांगितलं, असा मोठा दावा, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी केला आहे.
अजित पवारांच्या निधनापूर्वी त्यांच्याशी झालेल्या संवादाचा उलगडा उमेश पाटील यांनी केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दादांनी कधीही चर्चा केली नसल्याचे सांगितले. तसेच सुनेत्रा वहिनींकडे नेतृत्व सोपवण्याचे त्यांनी समर्थन केले आहे.
दादांशी झालेली शेवटची चर्चा
उमेश पाटील यांनी सांगितले की, "विमान अपघाताच्या अगदी एक दिवस आधीही माझे दादांशी बोलणे झाले होते. तसेच अतिवृष्टीच्या दौऱ्यात मी त्यांच्यासोबत हेलिकॉप्टर आणि गाडीतून बराच प्रवास केला होता. मी त्यांना अनेकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याबाबत विचारणा केली होती. पण त्यांनी नेहमीच 'अशी कुठलीही चर्चा नाही' असे ठामपणे सांगितले होते."
(नक्की वाचा- NCP Merger News: राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरून मतभेद; अजित पवारांच्या 'या' नेत्यांना विरोध)
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे समर्थन
अजित पवारांनंतर पक्षाची धुरा कोण सांभाळणार, यावर उमेश पाटील यांनी स्पष्ट मत मांडले. ज्याप्रमाणे राजीव गांधींनंतर सोनिया गांधींनी काँग्रेस सांभाळली, त्याचप्रमाणे सुनेत्रा वहिनी राष्ट्रवादीचा परिवार सांभाळू शकतात, असंही उमेश पाटील यांनी म्हटलं.
सुनेत्रा पवार यांना राजकीय पार्श्वभूमी आहे आणि अजित दादांच्या कामाचा व्याप मोठा असताना त्यांनी बारामती आणि इतर सामाजिक कामे समर्थपणे सांभाळली आहेत. नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत पक्ष आणि पवार कुटुंब जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, असं देखील उमेश पाटील यांनी स्पष्ट केलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या अशी माझी इच्छा नाही
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होण्याबाबत माझी स्वतःची इच्छा नाही, मात्र यावर वरिष्ठ स्तरावर जे ठरेल तो निर्णय अंतिम असेल, असं देखील उमेश पाटील यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Ajit Pawar: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार? कुटुंबातील 3 आणि कुटुंबाबाहेरील 3 नावे चर्चेत)
कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी परिवारावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यासाठी आता कार्यकर्त्यांना जिद्दीने उभे राहावे लागेल, असे आवाहन प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. कार्यकर्त्यांनी कोणताही जल्लोष करू नये आणि संयम पाळावा. अजित दादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर त्यांचा विकासाचा दृष्टीकोन लोकांपर्यंत पोहोचवून मते मागावीत.