
सागर कुलकर्णी, जुई जाधव | मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये बैठकांवर बैठक सुरु आहेत. एकीकडे महायुतीकडून घटस्थापनेच्या मुहूर्तावर उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर महाविकास आघाडीची जागावाटपचा चर्चा देखील अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.
(नक्की वाचा- लोकसभेच्या निकालानंतर महायुती सरकार 'टॉप गियर'वर; योजना, विकासकामांचा धडाका)
महायुतीच्या बैठकीत काय ठरलं?
महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे शनिवारी रात्री बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. महायुतीचा जागावाटपाचा तिढा कायम आहे. जवळपास 53 पेक्षा जास्त जागा जिथे अद्याप चर्चा होणे बाकी आहे. अमित शाह यांच्या दौऱ्याआधी किमान मुंबईतील जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. जागा वाटप प्राधान्याने सोडवण्यासाठी पुन्हा महायुतीच्या नेत्यांची आज किंवा उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. तीन पक्षांचा दावा असलेल्या जागांवर कुठला उमेदवार उजवा ठरू शकतो, तिथली राजकीय आणि जातीय समीकरणे याचाही विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(नक्की वाचा- 'सांगली पॅटर्न'ची आठवण करुन द्या, शिवसेनेच्या आक्रमकतेला आवर घालण्यासाठी काँग्रेस हायकमांडचे आदेश?)
जिंकूण येणाऱ्या जागा किती, कुठल्या जागांवर अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे यावर विचार विनिमय केला जात असल्याचे कळत आहे. निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्या मुद्यांवर भर द्यायला हवा, कुठले वादग्रस्त मुद्दे प्रकर्षाने टाळायला हवेत, वचननाम्यात नागरिकांशी निघडीत मुद्यांना प्राधान्य असायला हवे, प्रचार आणि सभांची जबाबदारी त्याच बरोबर नियोजन या सर्व गोष्टींवर बैठकीत सखोल चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महाविकास आघाडीत मुंबईतील कोणत्या जागांवरुन तिढा
महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपाचा विचार केला तर भायखळा आणि वर्सोवाच्या जागेचा वाद आता दिल्ली हायकामांड समोर मांडला जाणार आहे. मुंबई काँग्रेसने भायखळा आणि वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचा मुद्दा दिल्लीतील पक्षाच्या हायकमांडसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या दोन जागांवर दावा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरळी आणि शिवडी जागा काँग्रेस पक्ष मागू शकत नाही कारण ते शिवसेना ठाकरे गटाचे गड आहेत.
(नक्की वाचा- अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या मतदारसंघावर भाजपचा दावा; 'नोटा'ला मतदान करण्याचा इशारा)
दक्षिण मुंबईत, जर काँग्रेसला भायखळ्याची जागा मिळू शकली नाही, तर काँग्रेस फक्त मुंबादेवी आणि कुलाबा या दोन मतदारसंघांपुरती मर्यादित राहते. वर्सोवा मतदारसंघात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह काँग्रेसमधील 20 अर्जदार आहेत. विशेष म्हणजे भायखळा जागेसाठी काँग्रेस अल्पसंख्यांक चेहरा देण्याच्या तयारीत आहे. तर ठाकरे गट माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
(नक्की वाचा - Audio Clip : "अक्षय शिंदे याची जी हत्या झाली..", जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ)
वर्सोवा या जागेसाठी ठाकरे गटाकडून राजुल पटेल यांना जागा देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या दोन जागांसाठी काँग्रेस पक्ष दिल्ली हायकमांड पुढे जाण्याच्या तयारीत आहे. वांद्रे पूर्व, दिंडोशी, अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघांवरून देखील महाविकास आघाडीत मतभेद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world